महाराष्ट्रामध्ये सत्तेत असणारं ठाकरे सरकार हे भ्रष्टाचारी असून त्यांच्यामुळे मागील अडीच वर्षांमध्ये आम्हालाही अनेकदा वाईट वागणूकीचा सामना करावा लागला असा धक्कादायक दावा एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी केलाय. इतकचं नाही तर केवळ सत्तेसाठी विरोधी विचारसणीच्या पक्षांसोबत शिवसेनेच्या नेतृत्वाने सरकार स्थापन केल्याचा दावाही या आमदारांनी केलाय.

नक्की वाचा >> ‘संजय राऊत प्रत्यक्षात..’, ‘मंत्रीपद नको पण..’, ‘माझे पुतळे का..’, ‘अन्यथा मी..’; कॉलदरम्यान शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे आम्ही शिवसेनेचे सदस्य आहोत. आम्ही एकमताने एकनाथ शिंदे यांची ३१ ऑक्टोबर २०१९ मध्ये शिवसेनेचे विधीमंडळाचे गटनेते म्हणून निवड केली होती. २०१९ साली झालेल्या १४ व्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी निवडणूक पूर्व युती झाली होती. मात्र सरकारमधील भ्रष्टाचारामुळे पक्षातील सदस्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (जे आता तुरुंगामध्ये आहेत) आणि विद्यमान अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (जे सध्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याच्या आरोपांवरुन तुरुंगात आहेत) यांनी पोलिसांच्या नियुक्त्यांबरोबरच मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आलाय. तसेच या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आम्हाला या अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये बरंच काही ऐकावं लागलं असल्याचाही उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आलाय.

वरील कारणांबरोबरच राजकीय आणि खासगी स्तरावर आमचा विरोधी मतप्रवाह असणाऱ्या राजकीय पक्षांकडून छळ केला जातो. हे पक्ष सध्या सरकारमध्येच असून ते शिवसेनेच्या सत्तेचा आणि यंत्रणेचा वापर करुन आमचा छळ करत आहेत.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंची आदित्य ठाकरे, संजय राऊतांसोबत बाचाबाची; दोन दिवसांपूर्वीच पडलेली वादाची ठिणगी

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससारख्या विरोधी विचारसरणीच्या पक्षांसोबत युती केल्यापासून आमच्या पक्षामध्ये फारच गोंधळ सुरु आहे. महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवण्यासाठी आमच्या पक्षाने मूळ धोरणांपासून प्रतारणा केली आहे. मागील अडीच वर्षांपासून हा प्रकार सुरु आहे. मराठी माणसासाठी लढण्याची शिवसेनेची भूमिकाही यासारख्यामुळे मागे पडली आहे, अशी टीका या आमदारांनी केलीय.

नक्की वाचा >> राजकीय घडामोडींचा योगा’योग’ अन् खुर्ची! ऋषिकेश जोशीच्या पोस्टवर विश्वास नांगरे-पाटलांची कमेंट; म्हणाले, “भावा, खुर्ची…”

शिवसेनेच्या नेतृत्वाने निवडणूकपूर्व युतीऐवजी विरोधी विचारसणीच्या पक्षांसोबत सत्ता स्थापन केली. केवळ सत्तेसाठी पक्षनेतृत्वाने हा निर्णय घेतला असून यामुळे शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून आम्हाला बरंच भोगावं लागल्याचा दावा या आमदारांनी केलाय.

नक्की पाहा >> Video: “…तर बाळासाहेब ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता”

याच पत्रामध्ये शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असंही या आमदारांनी जाहीर केलंय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra political crisis shivsena rebel mla says thackeray government is corrupt scsg