संगमनेर : राज्यातील कर्तबगार आमदार म्हणून अमोल खताळ यांची ओळख निर्माण झाली आहे. काम मंजूर करून घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. संगमनेर तालुक्यात औद्योगिक वसाहतीची त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी पुढील आठवड्यातच बैठक घेणार असल्याचे आश्वासन उद्योग तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी दिले.
आमदार खताळ यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ तमाशा कलावंत स्व.कांताबाई सातारकर यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेल्या पहिल्या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण मंत्री सामंत यांच्या हस्ते आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यंदाचा पुरस्कार सातारा जिल्ह्यातील वाई येथील तमाशा कलावंत कोंडीराम आवडे मास्तर यांना प्रदान करण्यात आला. मानपत्र, स्मृतिचिन्ह, २१ हजाराचे मानधन असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ.गणेश चंदनशिवे, शाहीर विठ्ठल उमप यांच्या कन्या संगीता आणि कविता, प्रा. एस. झेड देशमुख, बापुसाहेब गुळवे, डॉ. सोमनाथ मुटकुळे, कपिल पवार, रामभाऊ राहाणे, विठ्ठल घोरपडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मंत्री सामंत म्हणाले की, आवळे मास्तर यांचा सन्मान एकट्याचा नसून राज्यातील सर्व लोककलावंतांचा आहे. यापूर्वी असे काम तालुक्यात झाले नाही. पण तुम्ही खताळ यांच्या रूपाने निवडून दिलेल्या लोकप्रतिनीधीने कलावंतांचा केलेला सन्मान सोहळा पाहिला तर तुम्हा मतदारांचे सुध्दा कौतुक वाटते. औद्योगिक वसाहतीची केलेली मागणी मला नाकारणे शक्य नाही. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नसल्याचे सांगितले.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, संगमनेर तालुका कलावंतांची खाण आहे. यापूर्वी कोणत्याच कलाकाराचा असा सन्मान झाला नाही. खताळ यांच्या माध्यमातून झालेला सन्मान सोहळा तालुक्याची नवी ओळख निर्माण करणारा ठरला असल्याचे सांगून लोककलेची जोपासना करणाऱ्या कलावंतांनी स्वतःचे दुःख बाजूला ठेवून समाजाला आनंद देण्याचा प्रयत्न केला. आवळे मास्तर यांनी त्या भावनेतून रंगभूमीची सेवा केली. यापुढे तालुक्यात काॅ. दत्ता देशमुख, भास्कराराव दुर्वे, शाहीर विठ्ठल उमप, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या जयंती दिनाचे सोहळे आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार खताळ, पुरस्कारार्थी आवळे मास्तर यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन स्मिता गुणे यांनी केले. यानिमित्ताने ज्येष्ठ छायाचित्रकार आण्णासाहेब काळे यांनी टिपलेल्या तमाशा कलेतील विविध छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
