अलिबाग – मुंबई गोवा महामार्गावर मौजे रातवड गावच्या हद्दीत एसटी बसला अपघात होऊन पलटी झाल्याने ७ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. २९ जुलै रोजी श्रीवर्धन भिवंडी बस माणगावहून मुंबई बाजूकडे जात असताना सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान मौजे रातवड गावच्या हद्दीत आल्यावेळी चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्याने बस महामार्गाच्या खाली जाऊन शेतात पलटी झाली. बसमध्ये एकूण २४ प्रवासी प्रवास करीत होते. या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

या अपघातात निकिता जितेंद्र पवार, वय ३० वर्ष, जितेंद्र पवार, वय ३५ वर्ष, जिनल जितेंद्र पवार, वय ९ वर्ष, महेश मारुती जाधव, वय २४ वर्ष, रोहित पांडे, वय ३० वर्ष, माया जाधव, वय ५५ वर्ष व बस चालक असे एकूण ७ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे दाखल करण्यात आले असून घटनेचा पुढील तपास माणगाव पोलिस करीत आहेत.