पंढरपूर : आषाढी यात्रेसाठी सोलापूर जिल्ह्यात प्रमुख संतांच्या व अन्य पालख्यांनी प्रवेश केल्यावर सर्व सोयीसुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. पालखी सोहळा प्रमुखांनी सुचविलेल्या पालखी मार्ग, पालखी तळ आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणची कामे प्राधान्याने आणि दर्जेदार करावीत. तसेच पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता सर्व विभागांनी घेऊन कामाचे नियोजन करावे, अशा सूचना सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहे. आषाढी यात्रेचा प्रमुख दिवस म्हणजे एकादशी सोहळा ६ जुलै रोजी आहे.

वारकरी संप्रदायातील महत्त्वाच्या चार वारी आहेत. यातील आषाढी यात्रा ही पायी चालत पंढरीकडे येते. या साठी एकीकडे वारकऱ्यांची वारीसाठी लगबग तर दुसरीकडे प्रशासनाचे येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा देण्यासाठी नियोजन सुरू आहे. आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीबाबत श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्त निवास, पंढरपूर येथे दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हीसीव्दारे) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री, उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर आदी उपस्थित होते.

आषाढी यात्रेसाठी सोलापूर जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे ३० जून तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १ जुलै रोजी आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर कामाचा आढावा घेतला जात आहे. यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, जिल्ह्यातील सर्वच पालखी तळांवर कोठेही पाणी साठणार याची दक्षता घेऊन, मुरमीकरण करून घ्यावे. पालखी मार्ग, तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी मुबलक पाण्याची व्यवस्था करावी यासाठी टँकरची संख्या वाढवावी. पालखी सोहळ्यासह येणाऱ्या भाविकांना आवश्यक सुरक्षा देण्यात यावी. तसेच मार्गावर वाहतुकीची समस्या निर्माण होणार नाही याबाबत नियोजन करावे.

पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथे सर्वच पालखी सोहळे एकत्र येत असतात. याठिकाणी वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये तसेच वाखरी पालखी तळावरून पंढरपूरकडे दिंड्या लवकर निघण्यासाठी सोहळा प्रमुखांशी पोलीस प्रशासनाने चर्चा करून नियोजन करावे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालखी मार्गावरील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यावेळी दिल्या आहेत.