सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने काही प्रमाणात उघडीप दिल्याने शेतकरी आणि बागायतदारांना दिलासा मिळाला आहे. ढगाळ वातावरण असले तरी पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला असला तरी, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची धास्ती मात्र कायम आहे. हंगामपूर्व पावसामुळे झालेल्या नुकसानीतून सावरत असतानाच, मान्सून दाखल झाल्याची हवामान खात्याची घोषणा शेतकरी आणि बागायतदारांसाठी आणखी एक धक्कादायक बातमी ठरली आहे. एरवी ५ जूनच्या आसपास दाखल होणारा पाऊस यंदा जवळपास दहा ते पंधरा दिवस आधीच दाखल झाल्याने सर्वांचीच झोप उडाली आहे. बदलत्या हवामानाचे अंदाज आणि ठोकताळे यंदा पूर्णपणे चुकल्याचे दिसून येत आहे.

या अवकाळी आणि वळिवाच्या मान्सूनमुळे शेतकरी, बागायतदार, कष्टकरी कामगार, व्यापारी आणि विक्रेते या सर्वांचेच मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांना आणि बागायतदारांना शेती व बागायतीची मशागत करण्यासाठी वेळच मिळाला नाही. आर्थिक नियोजन कोलमडले असून, अनेक विक्रेत्यांची गुंतवणूक वाया गेली आहे. लग्नकार्यांवरही पावसाने पाणी फिरवले असून, अनेक मंगलकार्यांचा आनंद हिरावून घेतला आहे. इतकेच नाही तर सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम, नगरपरिषद, ग्रामपंचायत आणि आरोग्य योजनेची अशा शासकीय पातळीवरील सर्व कामांवरही पावसाचा विपरीत परिणाम झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि विकासात्मक नुकसान झाले आहे.

विशेषतः आंबा, काजू, नारळ, सुपारी, जांभूळ, कोकम यांसारख्या फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, विक्रेत्यांचीही मोठी गुंतवणूक धोक्यात आली आहे. पावसामुळे तात्पुरती उसंत मिळाली असली तरी, झालेल्या नुकसानीतून सावरण्यासाठी दीर्घकाळ लागणार असल्याचे चित्र सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसत आहे.

( कोकम )