राज ठाकरेंनी आज सकाळी कर्नाटक प्रश्नी एक ट्वीट केलं आहे. होतं. मात्र ते ट्वीट राज ठाकरेंनी हटवलं आहे. आधीच्या ट्वीटमध्ये सीमाभागातील मराठी उमेदवारांना निवडून द्या असा आशय आधीच्या ट्वीटमध्ये होता. मात्र आता जे ट्वीट राज ठाकरेंनी केलं आहे त्यामध्ये राज ठाकरेंनी काही तासात भूमिका बदलली आणि महाराष्ट्र एकीककरण समितीच्या उमेदवारांना निवडून द्या असं म्हटलं आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान होतं आहे. आज प्रचार संपला आहे. अशात राज ठाकरेंनी एका दिवसात दोन भूमिका बदलल्याचं पाहण्यास मिळालं. कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक भूमिका राज ठाकरेंनी सकाळी मांडली होती त्यात त्यांनी म्हटलं होतं की सीमाभागातल्या मराठी उमेदवारांनाच निवडून द्या. मग अवघ्या काही तासांमध्ये भूमिका बदलत आधीचं ट्वीट डिलिट करून नवी भूमिका राज ठाकरेंनी मांडली या ट्वीटमध्ये राज ठाकरेंनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून द्या असं म्हटलं आहे.
काय आहे काही वेळापूर्वी केलेलं ट्वीट?
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १० मे ला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच मतदान करा. इतर पक्षांचे उमेदवार मराठी असले तरी ते निवडून आल्यावर मराठी भाषेच्या गळचेपीविरोधात किंवा मराठी माणसांवर सीमाभागात होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात विधानभवनात तोंड उघडणार नाहीत.
तुम्ही ज्या राज्याचे आहात, त्या राज्याची भाषा, तिथली संस्कृती ह्याचा आदर केलाच पाहिजे, ह्या ठाम मताचा मी आहे. सीमाभागात कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा आणि इथली संस्कृती ह्याचा मान राखत आले आहेत. पण तरीही तिथलं सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही.
मध्यंतरी जेंव्हा पुन्हा एकदा सीमावदाला कर्नाटक सरकारकडून खतपाणी घालून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता, तेंव्हा मी म्हणलं होतं की कर्नाटक आणि महाराष्ट्रात मुळात एकजिनसीपणा आहे. इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. तेंव्हा खरंतर कर्नाटक सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली तर संघर्षाची वेळच येणार नाही. पण कुठल्याही पक्षाचं सरकार तिकडे येऊ दे त्यांच्या वागण्यात यत्किंचितही फरक नसतो. म्हणूनच तिथल्या विधानभवनात मराठी भाषिक आमदार, जो त्या भागातील मराठी अस्मितेचं प्रतिनिधित्व करेल, मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवेल अशी लोकं असायला हवीत.
ह्यासाठी सीमाभागातील लोकांना १० मे ला संधी आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवं, हे तुमच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या हिताचं आहे.
ही संधी दवडू नका.
आपला
राज ठाकरे
असं ट्वीट राज ठाकरेंनी केलं आहे. मात्र आज सकाळी त्यांनी जे ट्वीट केलं होतं त्यात वेगळी भूमिका मांडली होती. त्यामध्ये सीमाभागातल्या मराठी उमेदवारांना निवडून द्या मग तो कोणत्याही पक्षाचा असो असं म्हटलं होतं. कर्नाटक निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सकाळी एक भूमिका आणि दुपारी वेगळी भूमिका मांडल्याने राज ठाकरेंनी या प्रश्नावर यू टर्न घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.