सातारा : सातारा जिल्हा रुग्णालय प्रशासनाने मागील दोन वर्षांचा विशाखा समितीचा अहवाल तत्काळ सादर करण्याचा आदेश विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिला. तसेच फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणी तपासात कोणतीही ढिलाई होऊ नये आणि संबंधितांना न्याय मिळावा यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे. सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयाने या प्रकरणातील आरोपपत्र वेळेत दाखल करावे, असाही आदेश गोऱ्हे यांनी या वेळी दिला.

फलटण तालुक्यातील महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे भेट देत आढावा बैठक घेतली. या बैठकीस आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक आरोग्य सेवा हे उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे पोलीस अधीक्षक (सातारा) तुषार दोषी, जिल्हा चिकित्सक (सातारा) डॉ. युवराज कर्पे, फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंशुमन धुमाळ, उपसंचालक (पुणे) डॉ. आर. बी पवार सहभागी झाले होते.

धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर या कंत्राटी वैद्यकीय अधिकारी होत्या. रुग्णालयातील सर्व सहकाऱ्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यांच्याविरुद्ध कोणाचीही तक्रार नव्हती. शवविच्छेदन विभागात त्यांच्यासोबत दोन महिला डॉक्टर कार्यरत असून, कामकाजात कोणताही दबाव नसल्याचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. रुग्णालयात सुमारे ५० टक्के महिला कर्मचारी कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस विभागाने काही अहवाल रुग्णालयाला सादर केला होता, ज्यावर समितीने चौकशी केली. तथापि, कोणतीही विभागीय चौकशी करण्यात आलेली नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी आदेश दिला, की सातारा जिल्हा रुग्णालयाने आपल्या अखत्यारीतील सर्व रुग्णालयांचा दोन वर्षांचा विशाखा समिती अहवाल तयार करून सादर करावा. तसेच तपासात कोणतीही ढिलाई होऊ नये आणि संबंधितांना न्याय मिळावा यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे. तसेच, शवविच्छेदन व प्रसूती विभागातील डॉक्टरांवर ताण निर्माण होऊ नये यासाठी त्यांच्या मार्गदर्शनार्थ मदत कक्ष स्थापन करण्याची सूचनाही त्यांनी केली.

‘पोक्सो’च्या प्रकरणात रुग्णालयात दाखल पीडितेसोबत असणाऱ्या एका नातेवाइकाचीदेखील जेवणाची सोय करावी. तसेच गर्भवती महिलेच्या सोबत तिच्या पतीचेही मार्गदर्शन करण्यात यावे, असेही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी या वेळी सांगितले.