मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी कर्जत येथे पक्षाच्या सहकार मेळाव्यात बोलत असताना शनिवारी वर्तमान राजकारणावर जोरदार टीका केली होती. “महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून सहकार चळवळ उभी राहिली. मात्र आता असलेले सरकार म्हणजे सहकार चळवळ नाही. तर ‘सहारा’ चळवळ आहे. अडकलेल्यांना सहारा द्या. सगळ्यांनी मिळून सरकार चालवायचं म्हणजे सहकार चळवळ नाही.” असा टोला राज ठाकरेंनी लगावला होता. यावर आता शिवसेना शिंदे गटाच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील आणि संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजकारण्यांनी स्वाभिमान गहाण ठेवला आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देत असताना गुलाबराव पाटील म्हणाले, “ज्यांनी आपल्या विचारांना तिलांजली देऊन स्वाभिमान गहाण ठेवला असेल, त्यांना हे लागू होईल. आम्ही पक्षांतर केले म्हणून ते आम्हाला बोलले, असे कुणाला वाटत असेल तर आम्हाला मात्र त्या गोष्टीचा पश्चाताप नाही. कारण आम्ही भगव्या झेंड्याच्या विचाराने ३५ वर्ष पक्षाचे काम केले. ते विचार आम्ही सोडलेले नाहीत. ज्यांनी हे विचार सोडले त्यांना राज ठाकरे जे बोलले ते लागू होईल.”

हे वाचा >> “राजकीय नेते लाचार, मिंधे, पैशांसाठी…”, राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी; महात्मा फुलेंचे उदाहरण देत म्हणाले…

सध्या जे राजकारण सुरू आहे, ते तसेच राहिले, तर महाराष्ट्राचे तुकडे होतील. विदर्भ आणि इतर प्रांत वेगळे होऊ शकतात, अशी भीती राज ठाकरे यांनी व्यक्त केली होती. यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, राज ठाकरेंचे विचार आहेत. पण यावर महाराष्ट्र चालेल की नाही? याची मला कल्पना नाही.

राज ठाकरेंची टीका सकारात्मक पद्धतीने घेऊ

दुसरीकडे आमदार संजय शिरसाट यांनी मात्र राज ठाकरेंची टीका सकारात्मक पद्धतीने घेऊ, असे म्हटले. राज ठाकरे यांनी आजवर सरकारला दिलेल्या सूचना सकारात्मक पद्धतीने घेतल्या आहेत. ते एका पक्षाचे नेते आहेत, त्यांनी काय बोलावे हा त्यांचा विषय आहे. सरकार गतिमान पद्धतीने काम करत आहे. पण राज ठाकरे यांनी काही आरोप केले, तर निश्चितच त्याचा त्रास आम्हाला होतो. त्यांच्या बोलण्यात नेहमीच वेगळेपण असते. त्यांच्या टीकेला आम्ही गांभीर्याने घेत असून जर आमचे काही चुकत असेल तर ते निश्चितच दुरुस्त करू.

आणखी वाचा >> राज ठाकरेंचा महायुती सरकारला टोला, “आत्ताचं सरकार म्हणजे ‘सहारा चळवळ’, आम्ही अडकलोय आम्हाला…”

काय म्हणाले होते राज ठाकरे?

“आपल्याकडचे नेते लाचार, मिंधे झाले आहेत. पैशांसाठी वेडे झालेले आहेत. त्यांना सत्त्व कळत नाहीत. त्यांना पाठिचा मणका नाही, स्वाभिमान नाही. आज इकडून तिकडे गेले, उद्या तिकडून इकडे आले, याशिवाय दुसरे काही चालू नाही. घरी गेल्यावर त्यांना कदाचित घरातलेही विचारत असतील आज कुठे आहात? मध्यंतरी मी विधानभवनातील एका कार्यक्रमात गेलो, तेव्हा मला कळेचना कोण कुठल्या पक्षात आहेत. त्यांनी त्यांची मने आणि स्वाभिमान गहाण टाकलेला आहे, पण तुम्ही तो टाकू नका. माझ्या मनसे सैनिकांकडून कधीही स्वाभिमान गहाण टाकला जाणार नाही”, अशी बोचरी टीका राज ठाकरे यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena shinde faction leaders reaction on raj thackeray speech about maharashtra politics kvg