सांगली : शैक्षणिक वर्षारंभापासूनच विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी बाणवाव्यात. शिस्त, वेळेचे महत्त्व, पुस्तकवाचन, मैदानी खेळ, फटाक्यांना फाटा देऊन प्रदूषणास आळा व पर्यावरण संवर्धन, तंबाखू व अमली पदार्थ व्यसनापासून दूर राहणे यांचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये रुजवावे. उत्तम शैक्षणिक सुविधा व चांगले संस्कार यातून आदर्श भावी पिढी घडवावी, असे प्रतिपादन राज्याचे उङ्ख व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केले.

शैक्षणिक वर्षारंभ विद्यार्थी प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा परिषद शाळा, बामणोली व महापालिका शाळा क्रमांक ७ येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच, मोफत गणवेश व पुस्तके वितरीत करण्यात आली.

जिल्हा परिषद शाळा बामणोली येथील कार्यक्रमात खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड तर महापालिका शाळा क्रमांक ७ येथील कार्यक्रमात आमदार सुधीर गाडगीळ, मनपा आयुक्त सत्यम गांधी, अतिरीक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त स्मृती पाटील, माजी उपमहापौर शेखर इनामदार, मुख्याध्यापिका स्मिता सौंदते यांच्यासह महानगरपालिका माजी पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, की विद्यार्थ्यांना हसत खेळत आनंददायी शिक्षण देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. शाळा बालकांचे भावविड घडविते. सामाजिक विकासात व राष्ट्र जडणघडणीत शाळेची भूमिका मोलाची आहे. त्यामुळे शाळेतून दिले जाणारे शिक्षण हे जीवनदायी असावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. पारंपरिक वेशभूषेत आलेल्या प्रातिनिधिक विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी त्यांना सवाद्य मिरवणुकीने शाळेत आणण्यात आले. तसेच प्रातिनिधीक स्वरूपात विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वितरीत करण्यात आली. माध्यान्ह भोजन जेवणात गोड पदार्थ देण्यात आला.