सांगली : विज्ञान तंत्रज्ञाच्या युगात कृत्रीम बुद्धिमत्तेचा वापर ऊस शेती क्षेत्रास सुरू झाला असून, फायदेशीर व अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी काळ बदलतोय तसे शेतकऱ्यांनीही बदलण्याची गरज आहे. ऊसशेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणाऱ्यांना अनुदान देण्याचा संचालक मंडळाचा विचार असल्याचा विश्वास साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यात ग्रीनकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र व नेटाफिम कंपनीच्या सहकार्याने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान व भविष्यातील ऊस शेती विषयावर स्मार्ट शेतकरी संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले, यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-सरुडकर प्रमुख उपस्थित होते.

अध्यक्ष श्री. नाईक म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापराने ४० टक्के उत्पन्न वाढ तर, ३० टक्के उत्पादन खर्चात बचत झाल्याचे सिद्ध झाले आहे. शिवाय ऊस शेत जमिनीमधील अचूक व आधुनिक माहिती मिळते. त्यामुळे ऊस शेतीमधील कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञाचा वापर अधिक सक्षम करणारा व फायदा देणारा ठरणारा आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी गुंठ्यात समूह शेतीचा प्रयोग राबविण्याचा विचार संचालक मंडळ करत आहे.

नेटाफिमचे कृषितज्ज्ञ अरुण देशमुख म्हणाले, शिराळा व शाहूवाडी डोंगराळ विभाग आहे. येथे सलग शेती नसून डोंगर, नदीकाठावर, काळी, मध्यम व मुरमाड स्वरूपाची आहे. बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहे. त्यामुळे ठिबक सिंचनाचा वापर करावा. त्याला नव्याने आलेल्या तंत्रज्ञानाची जोड द्यावी.

कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे डॉ. संतोष देशमुख म्हणाले, ऊस शेती जमिनीत कशाची आवश्यकता आहे, याची नेमकी माहिती या तंत्रज्ञानाच्या वापरातून मिळते. जमिनीचा वाफसा, सूर्यप्रकाश, कीड व रोगांची पूर्वकल्पना, रोगाचे नियंत्रण करण्याची माहिती, जमिनीत नत्र, पालाशची मात्रा, माहिती आदींचा समतोल राखण्याबाबत मार्गदर्शन, तापमान पर्जन्यमापक आदी माहिती मिळून त्यानुसार हवामान अंदाजाची अचूक माहिती पुरविली जाते. त्यामुळे पिकांस सर्व गोष्टी समतोल प्रमाणात मिळून ऊस शेती फायदेशीर होते. बारामती येथील प्रयोगात एकरी १५० टनापर्यंत उसाचे उत्पन्न मिळाले आहे.

यावेळी कारखान्याचे संचालक विराज नाईक यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक अमोल पाटील, कारखान्याचे आजी, माजी संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अनेक गावचे आजी, माजी सरपंच, उपसरपंच, सोसायट्याचे पदाधिकारी, कारखान्यातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालक शिवाजी पाटील यांनी आभार मानले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subsidies for those using artificial intelligence in sugarcane farming naik vishwas sugar factory initiative ssb