आमदारांनी केलेल्या उठाव यशस्वी झाला नसता, तर एकनाथ शिंदे यांनी गोळी झाडून घेतली असती, असा खळबळजनक दावा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. वर्धापनदिनाच्या दिवशीच एक नंबरच्या शिलेदाराचा अपमान केला. त्यांना खालच्या दर्जाची वागणूक दिली. त्यांचा अपमान का केला?, असा सवाल दीपक केसरकर यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दीपक केसरकर म्हणाले, “अस्मितेसाठी एकनाथ शिंदेंनी बंड केलं. उद्धव ठाकरे वचन द्यायचे आणि तोडायचे. एकनाथ शिंदे यांनी निश्चितपणे उठाव केला. नंतर एकनाथ शिंदेंना वाटलं, ही सर्व लोक माझ्याबरोबर प्रेमाने आली आहे. कारण, शिंदेंचा अपमान झाला, तो दिवस वर्धापनदिनाचा होता.”
हेही वाचा : “मंत्रिमंडळ विस्तार करण्याची क्षमता सरकारमध्ये नाही,” बच्चू कडूंचा शिंदे-फडणवीसांना घरचा आहेर
“वर्धापनदिनादिवशीच एक नंबरच्या शिलेदाराचा अपमान केला. शिंदेंना खालच्या दर्जाची वागणूक दिली. एकनाथ शिंदे हे विधिमंडळाचे नेते होते. त्यांचा अपमान का केला? याचं उत्तर दिलं पाहिजे. एकनाथ शिंदे रागवून गेले असते, तर परत येण्याची तयारीही दाखवली होती,” असेही दीपक केसरकरांनी सांगितलं.
“एकनाथ शिंदे हे सच्चे शिवसैनिक आहेत. एकनाथ शिंदेंनी म्हटलं, ‘मला जेव्हा वाटलं उठाव यशस्वी होणार की नाही, तेव्हा एकच गोष्ट केली असती. माझ्याबरोबर आलेल्या सर्व आमदारांना परत पाठवलं असतं. मी एक फोन केला असता, माझी चूक झाली आहे. यांची काही चूक नाही. तिथेच माझ्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती,'” असं शिंदेंनी सांगितल्याचं दीपक केसरकर म्हणाले.
हेही वाचा : “नोटीस आल्यावर मोदींची भेट घेतली”, एकनाथ शिंदेंच्या दाव्यावर उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “रोज…”
“माझ्यामुळे एकाही आमदाराचं राजकीय नुकसान होता कामा नये, प्रसंगी जीव गेला तरी चालेल. असं म्हणणाऱ्या माणसाच्या मागे लोक उभी राहणार नाहीत, तर कोणाच्या राहणार,” असेही दीपक केसरकरांनी म्हटलं.