चंद्रपूर शहरातील पाणी टंचाई लक्षात घेता महाऔष्णिक विद्युत केंद्रातील सुरू असलेले ५०० मेगावॅटचे तीन संच बंद करणे आवश्यक आहे. त्यामुळे ही आणीबाणीची परिस्थिती बघता तीन संच उन्हाळय़ात बंद करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व या जिल्हय़ाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची महत्त्वपूर्ण बैठक मंत्रालयात येत्या चार ते पाच दिवसात होणार आहे. यात  संच बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन अर्थात महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या इरई धरणात सध्या केवळ २३ एमएम पाणीसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे, याच इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा होतो. पाणी टंचाई बघता वीज केंद्राचे चार संच बंद करण्यात आले असून ५०० मेगाव्ॉॅटचा सहावा संच वार्षिक देखभालीच्या नावाखाली बंद ठेवला आहे. ५०० मेगावॅटच्या ५,८ व ९ व्या क्रमांकाच्या संचातून आजघडीला केवळ १२०० ते १४०० मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. दरम्यान, चंद्रपूर शहराला एप्रिल व मे महिन्यात पाणी द्यायचे असेल तर वीज केंद्राचे तीन संच बंद करणे अनिवार्य आहे. मात्र, उन्हाळय़ात राज्यात सर्वत्र विजेची मागणी वाढत असल्यामुळे ती गरज बघता संच बंद करणे शक्य नाही, असे वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांचे मत आहे, तर महापालिका व जिल्हाधिकारी यांनी वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात वारंवार सूचना देत संच बंद करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, यात इरई धरणातील पाणी झपाटय़ाने कमी होत आहे. संभाव्य टंचाईची परिस्थिती लक्षात घेता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याही निदर्शनास ही बाब वेळोवेळी आणून देण्यात आली आहे, परंतु यावेळी मुनगंटीवार यांनी पाणी टंचाईचा विषय अतिशय गांभीर्याने घेत महाऔष्णिक वीज केंद्रातील संच बंद करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याही निदर्शनास पाणी टंचाईची बाब आणून दिली. त्यानंतर आता या विषयावर येत्या चार ते पाच दिवसात मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस, ऊर्जामंत्री बावनकुळे व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार या तिघांची संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत इरई धरणातील जलसाठय़ापासून तर वीज केंद्राला वीज निर्मितीसाठी लागणारे पाणी, त्यातून उत्पन्न होणारी वीज तथा चंद्रपूर शहराला लागणारे पाणी, संभाव्य उन्हाळा या विषयांवर चर्चा होणार आहे. या बैठकीत महाऔष्णिक विद्युत केंद्र एप्रिल व मे महिन्यात बंद करण्यासंदर्भात किंवा सुरू असलेल्या तीन  संच बंद करण्यासंदर्भात निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

५०० मेगावॅटचे दोन संच बंद झाले तर एप्रिल व मे या कडक उन्हाळय़ाच्या दोन दिवसात चंद्रपूरकरांना एक दिवसाआड का होईना पाणी मिळेल. सर्व संच सुरू राहिले तर पाणी संकट आणखीच भीषण होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधला असता, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील संच बंद करण्यासंदर्भात मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांची बैठक चार ते पाच दिवसात होणार असल्याची माहिती लोकसत्ताशी बोलताना दिली. या बैठकीत सकारात्मक निर्णय होण्याचे संकेतही त्यांनी दिले.

इरई धरण व औष्णिक केंद्राची आजची स्थिती

आजघडीला इरई धरणात केवळ २३ एमएम पाणीसाठा म्हणजेच धरणाची पातळी २०२.५२५ वर आहे, तर मृत पाणी साठा २० एमएम आहे. जलसंकट बघता चंद्रपूर शहरातील लोकांना प्रथम पिण्याचे पाणी देणे हे वीज केंद्राचे कर्तव्य आहे. त्यामुळे धरणातील जलसाठय़ाचा वीज निर्मितीसाठी झपाटय़ाने वापर होऊ नये, यासाठी आजघडीला एकूण चार संच बंद करण्यात आलेले आहेत. यातील २१० मेगावॅटचे ३ व ४ क्रमांकाच्या संचाचा समावेश आहे. त्यानंतर ५०० मेगावॅटचा सातव्या क्रमांकाचा संच बंद केला गेला आहे. पाचशे मेगावॅटच्या संचाला पाणी अधिक लागत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे, तर ५०० मेगावॅटचा सहाव्या क्रमांकाचा संच वार्षिक देखभाल व दुरुस्तीच्या नावाखाली पाणी उपलब्ध नसल्यामुळेच बंद ठेवण्यात आलेला आहे. ५०० मेगावॅटचे ५,८ व ९ व्या क्रमांकाचे एकूण तीन संच सुरू आहेत.

शासनाला अहवाल देणार

महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, नाशिकच्या अधीक्षक अभियंता श्रीमती आर.एस. देशमुख यांनी गेल्या आठवडय़ात महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणाला भेट देऊन पाण्याच्या पातळीची पाहणी केली. ही संस्था ३१ मार्चपर्यंत शासनाला यासंदर्भातील अहवाल सादर करणार आहे. या अहवालानंतरही वीज केंद्राचे संच बंद होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, २०१० च्या पाणी टंचाईनंतर आठ वर्षांत दुसऱ्यांदा संच बंद करण्याची वेळ येत असल्याने भविष्यातील वाटचाल अतिशय वाईट आहे, असेच यातून दिसून येत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water scarcity issue in chandrapur power generation station