मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळेल आणि अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशी विधानं करत आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांची भाजपाच्या नेत्यांशी जवळीक वाढत असल्याचीही चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. या सर्व घटनाक्रमानंतर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवारांची कुणालाही गॅरंटी नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नीलम गोऱ्हेंच्या या विधानानंतर राष्ट्रवादीचे नेते नाराज झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. विरोधी पक्षातील आमदारांना निधी दिला जात नसल्याच्या तक्रारीबाबत बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

पत्रकार परिषदेत नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, याआधी गिरीश बापट हे पुण्याचे पालकमंत्री होते. तेव्हा ते राष्ट्रवादीच्या आमदारांना प्रेमाने बोलावून निधी द्यायचे, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. पण आता तशी परिस्थिती राहिली नाही. कारण आता बरंच पाणी वाहून गेलंय. राज्यात महाविकास आघाडी एकत्र आली. शिवाय अजित पवारांची कुणालाही गॅरंटी नाही, असं विधान नीलम गोऱ्हेंनी केलं आहे.

हेही वाचा- एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा मूळ प्रस्ताव कुणी दिला? फडणवीसांनी दिलेलं उत्तर ऐकून बसेल धक्का

शिंदे-फडणवीस सरकारने विरोधी पक्षातील आमदारांचा निधी कपात केल्याबद्दल नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “आमदार म्हणून मला अजिबातच निधी दिला नव्हता. शेवटी, काल-परवा आम्ही खूप पाठपुरावा केल्यानंतर थोडाफार निधी देतो, असं सांगितलं. ही कामं तीन वर्षांपूर्वी मान्य झाली होती, त्यालाही निधी दिला नाही. पण मला वाटतं की, आज ना उद्या त्यांना (भाजपा) विरोधी पक्षातील आमदारांची दखल घ्यावी लागेल. त्यांनाही निधीचं वाटप करावं लागेल. कारण संबंधित मतदारसंघात भाजपाचे नगरसेवक, पंचायत समिती सदस्य असतात. त्यांचाही विचार करणं भाजपाला क्रमप्राप्त आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We dont have ajit pawars guarantee neelam gorhe statement rmm