२०१९ सालच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडीची स्थापना झाली.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांप्रमाणे समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष व प्रहार जनशक्ती पक्ष अशा काही पक्षांच्या आमदारांचा समावेश आहे. भारतीय जनता पार्टी (BJP) आणि शिवसेना यांच्यामध्ये सत्तावाटपावरुन त्यांची २५ वर्षांची युती तुटली. त्यानंतर केंद्र सरकारमध्ये मंत्री असणारे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी अजित पवार यांनी बंड करत देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकार स्थापन केले. पण बहुमत सिद्ध न करता आल्याने अवघ्या काही दिवसामध्ये हे सरकार कोसळले. याच काळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची (MVA) स्थापना केली.
अजित पवारांच्या (Ajit Pawar)बंडानंतर तीन दिवसांनी २६ नोव्हेंबर २०१९ रोजी झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. पुढे त्यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. हे सरकार अडीच वर्ष टिकले. शिवसेनेतील (Shivsena) एकूण ५५ आमदारांपैकी ४० आमदारांना सोबत घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) भाजपसह युती करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.Read More