समीर जावळे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मौत तू एक कविता है…
मुझसे एक कविता का वादा है…
मिलेगी मुझको जब दर्द को निंद आने लगे…
जर्द सा चेहरा लिये चाँद उफग तक पहुँचे…
दिन अभी पानीमें हो…
रात किनारे के करीब…
ना अंधेरा हो न उजाला…
जिस्म जब खत्म हो…

ही कविता रेकॉर्डवर संपते… आणि बाबू मोशाय… नावाची किंकाळी ऐकू येते… आणि आपल्याला चित्रपटभर हसवणारा आनंद (राजेश खन्ना) प्राण सोडतो. आपल्याही नकळत आपल्या डोळ्यांत आलेलं पाणी आपण पुसतो. आनंद हा राजेश खन्नाचा अजरामर सिनेमा आहे, असंच म्हणता येईल. कारण या सिनेमातील त्याच्या अभिनयाला तोड नाही. आजच्याच दिवशी हा सिनेमा ५३ वर्षांपूर्वी मुंबईतल्या स्वस्तिक सिनेमागृहासह इतर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता.

आनंद, माणसाला जगणं शिकवणारा सिनेमा

अमिताभ बच्चन, रमेश देव, सीमा देव, ललिता पवार, जॉनी वॉकर अशी तगडी स्टार कास्ट आणि राजेश खन्ना मध्यवर्ती आनंदच्या भूमिकेत. आयुष्याचं तत्त्वज्ञान आनंद आपल्याला त्या दोन-अडीच तासांमध्ये आपोआप सांगून जातो. हसता हसता रडवतो आणि डोळ्यांत आलेलं पाणी पुसायला तसंच जगायला शिकवतो. “जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नही… बाबू मोशाय.” हा डायलॉग असेल किंवा “मै तुझे क्या आशीर्वाद दूँ बहन. ये भी तो नहीं कह सकता की तुझे मेरी उमर लग जाये!” कुठल्याही क्षणी हा सिनेमा पाहिला की ताजातवाना वाटतो. याचं कारण त्याचं कालातित असणं.

खरं तर एका ओळीची कथा पण..

कॅन्सरमुळे होणाऱ्या एका तरुणाचा मृत्यू अशी एका ओळीची कथा.. पण त्याभोवती जी प्रसंगांची आणि गाण्यांची गुंफण हृषिकेश मुखर्जींनी केली आहे त्याला खरंच तोड नाही. हृषिकेश मुखर्जींनी चित्रपट जसा लिहिला आहे तितकीच या चित्रपटाची जान आहे तो म्हणजे राजेश खन्ना. राजेश खन्नाने या चित्रपटातला केलेला अभिनय हा अगदी सहज सुंदर आहे. “जिंदगी और मौत तो उपरवाले के हातमें है जहाँ पनाह… इसे ना आप बदल सकते हैं न मै.. हम सब तो रंगमंच की कठपुतलींयाँ हैं जिनकी डोर उपरवालेके हात में बंधी है. कब कौन कहाँ कैसे उठेगा ये कोई नहीं बता सकता.” मृत्यू या शाश्वत सत्याचं तत्त्वज्ञान ज्या सहजपणे चित्रपटांतले दोन नायक आपल्या मनात हसत हसत उतरवतात ती खरोखरच हृषीकेश मुखर्जींचीच कमाल आहे.

संवाद आणि संगीत ही सर्वात जमेची बाजू

या सिनेमाची सर्वात जमेची बाजू म्हणजे यातली गाणी.. ‘मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने’, ‘जिंदगी कैसी है पहेली’ , ‘कहीं दूर जब दिन ढल जाए सांज की दुल्हन…’ एकाहून एक सरस गाणी आणि त्याला दिलेलं सलील चौधरींचं संगीत हे आजदेखील कानात वाजतं. रमेश देव, सीमा देव, अमिताभ यांच्या भूमिका इतक्या अप्रतिम झाल्या आहेत की त्यादेखील आपल्या मनात नकळत घर करुन जातात. या सिनेमाच्या जन्माची कथाही फार फार वेगळी आहे. हृषीकेश मुखर्जींना आनंद चित्रपट राज कपूर यांच्यामुळे सुचला होता.

हृषीकेश मुखर्जी आणि राज कपूर यांची मैत्री आणि आनंद सिनेमाचा जन्म

हृषीकेश मुखर्जी आणि राज कपूर या दोघांची मैत्री खूप घट्ट होती. या दोघांनी ‘नोकरी’ नावाचा एक सिनेमाही केला होता पण तो चालला नाही. गौतम चिंतामणी यांनी लिहिलेल्या राजेश खन्ना -डार्क स्टार नावाच्या पुस्तकात राज कपूर आणि हृषीकेश मुखर्जी यांच्या मैत्रीचा उल्लेख आहे. ते लिहितात, या दोघांची मैत्री जुनी होती. एक आजारी माणूस त्याला हवं असलेलं आयुष्य त्याच्या मनाप्रमाणे जगतो ही कल्पना हृषीदांना सुचली ती राज कपूर यांच्याकडे पाहून. राज कपूर त्यावेळी खूप आजारी पडले होते. खरंतर त्यावेळी हृषीकेश मुखर्जींना असं वाटलं होतं की, राज कपूर जिवंत राहणार नाहीत. मात्र त्यांनी या आजारावर मात केली होती. राज कपूर वाचले पण ती कल्पना हृषीकेश मुखर्जींच्या मनात घोळत होती आणि त्यातूनच जन्माला आला ‘आनंद’!

आनंद सिनेमाची पहिली पसंती राजेश खन्ना नव्हते.

आनंदसाठी राजेश खन्ना नाही तर किशोर कुमार होते पहिली पसंती…

हृषीकेश मुखर्जींनी चित्रपटाची कथा लिहिली. चित्रपट गंभीर विषयाकडे झुकणारा असला तरीही हलकाफुलका होता. पण त्यात रोमान्स नव्हता. त्यामुळे त्या काळात वितरक हा चित्रपट करण्यास फारसे उत्सुक नव्हते. तसंच किशोर कुमार यांनी आनंद ही मध्यवर्ती भूमिका करावी, असं हृषीकेश मुखर्जींना वाटलं होतं. पण बात कुछ जमीं नही… यावरुन त्या दोघांमध्ये चांगलंच भांडणही झालं होतं असे किस्से काही जाणकार सांगतात. यानंतर शशी कपूर यांचा या भूमिकेसाठी विचार झाला. पण त्यांच्याकडे तारखा नव्हत्या.

हृषीकेश मुखर्जींनी चित्रपट राजेश खन्नाला कसा मिळाला तो किस्सा एका मुलाखतीत सांगितला होता. मला किशोर नाही म्हणाला आणि शशीकडे तारखा नव्हत्या त्यामुळे मी शांत होतो. एक दिवस माझ्याकडे राजेश खन्ना आला आणि म्हणाला हृषीदा तुमच्याकडे चांगला चित्रपट आहे असं मी ऐकलंय, ती कथा मला ऐकवा. यावर ते म्हणाले तुला तुझ्या तारखा द्याव्या लागतील तरच मी कथा ऐकवेन. ज्यानंतर राजेश खन्ना म्हणाला की, मला कथा आवडली तर मी कुठलीही अट मान्य करेन. राजेश खन्नाला त्यांनी कथा ऐकवली ज्यानंतर राजेश खन्ना नाही म्हणू शकलाच नाही.

अमिताभ कसा झाला बाबू मोशाय?

हृषीदांनी अमिताभ कसा गवसला तेदेखील सांगितलं होतं. ते म्हणाल होते, मी सात हिंदुस्थानीतला त्याचा अभिनय पाहिला होता पण तो मला इतका खास आवडला नव्हता. बाबू मोशाय म्हणजेच डॉक्टर भास्करच्या भूमिकेसाठी अंतर्मुख असणारा माणूस मला हवा होता. आमच्या काही भेटीगाठी झाल्यावर मला वाटलं की हाच तो डॉ. भास्कर अर्थात बाबूमोशाय.. असं हृषीदांनी सांगितलं होतं. राजेश खन्नाने म्हणजेच आनंदने डॉ. भास्करला बाबू मोशाय म्हणण्यामागेही कारण होते राज कपूर. कारण राज कपूर हे बऱ्याचदा हृषीकेश मुखर्जींना बाबू मोशाय याच नावाने हाक मारत. अत्यंत उत्तम प्रकारची भट्टी जमली आणि आनंद जन्माला आला.

सिनेमा प्रदर्शित होऊन ५३ वर्षे झाली आहेत पण..

राजेश खन्नाची ‘आनंद’ ही व्यक्तिरेखा उत्तम आणि अजरामर तर ठरलीच. कारण राजेश खन्ना आनंदची भूमिका जगला आहे. चित्रपटात एका कॅन्सरग्रस्त माणसाचं हरहुन्नरी जीवन दाखवण्यात आलं आहे. तो तीळ तीळ तुटत मरत नाही… उलट प्रत्येक क्षण आयुष्याला त्याच्या पद्धतीने अत्यंत आनंदाने मिठी मारतो, कवटाळतो. आहे तो क्षण जगायचा पुढे काय होणार ते कुणाला ठाऊक? भास्कर डायरीत आनंद विषयी नोंदी करत असतो. जेव्हा भास्कर त्याच्यासाठी होमिओपॅथी औषध आणायला गेलेला असतो त्याचवेळी बाबू मोशाय ही आरोळी ठोकत.. आनंद प्राण सोडतो… कारण त्याने दोस्तला (रमेश देव) सांगून भास्कर आणि त्याची रेकॉर्ड लावलेली असते. त्यानंतर रिळ फिरत राहतं.. भास्कर खोलीत येतो आणि त्याला म्हणतो पिछले छह महिनेंसे.. तुम्हारी बकबक सुनते आयाँ हूँ.. बाते करो मुझसे.. बाते करों.. आणि अचानक आवाज येतो.. बाबू मोशाय…आपणही चमकून पाहतो.. रेकॉर्डवर त्याचा आवाज आणि तो जिंदगी और मौत..चा डायलॉग ऐकू येतो.. दोन मिनिटांसाठी आपण स्तब्ध होतो. त्यानंतर भास्कर आनंद बाबतची शेवटची नोट डायरीत लिहितो आनंद मरा नहीं.. आनंद मरते नहीं.. सिनेमा प्रदर्शित होऊन ५३ वर्षे झाली आहेत.. पण हे वाक्य विसरता येत नाही!

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajesh khanna amitabh movie anand released on 53 years ago on this date read special article maindc scj