बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. किंबहुना ती तिच्या चित्रपटांपेक्षा वक्तव्यांमुळे जास्त चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी तिने भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. तिच्या या वक्तव्यामुळे तिच्यावर जोरदार टीका झाली होती. दरम्यान, आता कंगनाने शेअर केलेल्या राष्ट्रगीतावरून तिला ट्रोल केलं जातंय. कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीला एक व्हिडीओ पोस्ट करत “आपलं पहिलं राष्ट्रगीत, प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना अॅडव्हान्समध्ये शुभेच्छा”, असं कॅप्शन टाकलंय. तिने टाकलेल्या व्हिडीओमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस दिसत आहे. तिने टाकलेल्या गीताचे बोल “शुभ सुख चैन” असे आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी कंगनाला ट्रोल केलंय. ‘तुला काहितरी चुकीची माहिती मिळाली आहे,’ असं एका युजरने म्हटलंय. तर एकाने म्हटलंय की, ‘कंगनाचं डोकं खराब झालंय, पहिलं राष्ट्रगीत बंगालीमध्ये लिहिलं गेलं होतं, त्यानंतर त्याचं हिंदी आणि उर्दूमध्ये भाषांतर करण्यात आलं होतं. तुझ्याकडून हिच अपेक्षा होती. कारण जिच्यासाठी देशाला स्वातंत्र्य २०१४मध्ये मिळालं, तिच्याकडून राष्ट्रगीताबद्दल माहिती असण्याची अपेक्षा पण ठेवणंही चुकीचं आहे.’ दरम्यान, भारताचं राष्ट्रगीत निवडण्यात सुभाषचंद्र बोस यांचा मोठा वाटा होता. 'जन-गन-मन' हे राष्ट्रगीत निवडण्यात आल्यानंतर बोस यांनी टागोरांच्या मूळ गाण्याचे रुपांतर, हिंदी आणि उर्दू शब्दांसह केले, ज्याचे बोल “शुभ सुख चैन” असे आहेत.