Hemant Dhome On Kundmala Bridge Collapse : पुण्यामधील मावळ तालुक्यातील कुंडमळा हे एक पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे आठवड्याच्या अखेरीस या ठिकाणी अनेक पर्यटकांची गर्दी होत असते. अशातच रविवार, १५ जून रोजी इथे एक दुर्घटना घडली. रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून काही पर्यटक वाहून गेले. इंद्रायणी नदीच्या प्रवाहात सुमारे ३० ते ४० जण वाहून गेल्याचे वृत्त आहे, तर या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असल्याचीही माहिती आहे.
जेव्हा ही घटना घडली तेव्हा अंदाजे ५० च्या आसपास पर्यटक या पुलावर होते, त्यामुळे वजन वाढल्याने हा पूल कोसळल्याचं बोललं जात आहे. हा पूल खूप जुना असल्याचेही वृत्त आहे. या घटनेनंतर काही राजकीय नेते मंडळींनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशातच मराठी अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमेने या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हेमंतने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) या घटनेबद्दलची पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये हेमंत असं म्हणतो, “इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून जी दुर्घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी आहे… लोक वाहून गेलेत आणि संख्या आपल्याला माहीत नाही… पूल ५० वर्षे जुना होता, त्याची दुरुस्ती करणं गरजेचं होतं. सरकारने मंजुरी देऊनही काम सुरू झालं नाही. सरकारने जागं व्हावं, असे पूल आपल्याकडे अनेक ठिकाणी आहेत; त्याकडे लक्ष द्या! लाभार्थी योजनांना पैसे वाटप करताना दमछाक होते आणि काही गरजेच्या कामांना बाजूला ठेवलं जातं… त्याचं हे उत्तम उदाहरण.”
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून जी दुर्घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी आहे… लोक वाहून गेलेत आणि संख्या आपल्याला माहीत नाहीये…
— Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) June 16, 2025
पूल ५० वर्षे जुना होता, त्याची दुरुस्ती करणं गरजेचं होतं!
सरकारने मंजुरी देऊनही काम सुरू झालं नाही!
सरकारने जागं व्हावं!!! असे पूल आपल्याकडे अनेक ठिकाणी… pic.twitter.com/fXu0238VhG
कुंडमळा पूल दुर्घटनेत बेभान पर्यटकांचाही तितकाच दोष : हेमंत ढोमे
यानंतर त्याने असं म्हटलं, “या घटनेत बेभान पर्यटकांचाही तितकाच दोष आहे. पावसाळ्यात काही ठिकाणांना भेट देताना काळजी घ्यायला हवी. एवढं बेभान वागणं बरं नाही. त्या रील्सच्या नादात आपण किती बेजबाबदारपणे वागतो याचं थोडंही भान लोकांना राहिलं नाही. प्रशासनाकडून अशा ठिकाणी आता नियम घालून त्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे! नाहीतर रोज अश्याच बातम्या येत आहेत.”
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत
दरम्यान, राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी कुंडमळा येथील दुर्घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना सरकारकडून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे सांगितलं आहे. तसंच वाहून गेलेल्या पर्यटकांनासुद्धा वाचविण्याचे प्रयत्न यंत्रणांकडून सुरू आहेत.