Radhika Merchant On Wedding Date : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा भव्य विवाहसोहळा १२ जुलैला मुंबईत पार पडला. या जोडप्याच्या ग्रँड लग्नसोहळ्यासाठी मुंबईत तीन दिवसीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या दोघांच्या लग्न व ‘शुभ आशीर्वाद’ सोहळ्याला जवळपास दोन हजार लोकांनी उपस्थिती लावली होती. तर, रिसेप्शन पार्टीला जवळपास १४ हजार पाहुणे उपस्थित होते. याच पार्श्वभूमीवर नववधू राधिका मर्चंटने वोगशी संवाद साधला आहे.
अनंत-राधिकाच्या लग्नाला पंतप्रधान मोदींसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. एवढे दिग्गज लग्नाला हजेरी लावणार असल्याने अंबानी कुटुंबीयांकडून आधीच तयारी करण्यात आली होती. पाहुण्यांसाठी वेगवेगळे झोन तयार करण्यात आले होते. काही लोकांना लग्नात एन्ट्री घेण्यासाठी मोबाइलवर QR कोड पाठवण्यात आले होते. तर, अनेकांनी हातावर रिस्टबँड बांधल्याचं व्हायरल फोटो व व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
राधिका मर्चंटने सांगितलं लग्नासाठी १२ जुलै तारीख निवडण्यामागचं कारण
१२ ते १४ जुलै दरम्यान लग्नसोहळ्याचं आयोजन करण्यामागे काय कारण होतं? याचा खुलासा राधिका मर्चंटने वोगला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. अंबानींची धाकटी सून सांगते, “१२, १३ व १४ जुलै या तारखांची निवड आम्ही आधीपासून ठरवून केली होती. या तारखा आमच्या कौटुंबिक ज्योतिषाने आम्हाला सुचवल्या होत्या. अनंत व माझी जन्मपत्रिका पाहून त्यातल्या संरचना, ग्रह या सगळ्या गोष्टी पाहून आमच्या लग्नातारखा ठरवण्यात आल्या होत्या.”
हेही वाचा : Video : मराठमोळ्या अभिनेत्याने होस्ट केला अनंत-राधिकाचा ‘शुभ आशीर्वाद’ समारंभ! व्हिडीओमध्ये दिसली झलक
लग्नात येणाऱ्या सर्व पाहुण्यांना कार्यक्रमाच्या ६ तास आधी ई-मेल पाठवून त्यांची उपस्थिती कन्फर्म करण्यास सांगितली होती. यानंतर या पाहुण्यांना अंबानींच्या टीमकडून QR कोड पाठवण्यात आले होते. या सगळ्या पाहुण्यांचे कोड लग्नात प्रवेश घेण्यापूर्वी तपासण्यात आले होते. तर, काही सेलिब्रिटींना प्रवेश घेण्याआधी हातात बँड बांधण्यात आले होते.
अनेक ए-लिस्टर स्टार्स, क्रिकेटर्स आणि व्यावसायिकांच्या हातात शुक्रवारी गुलाबी रंगाचा बँड तर, शनिवारी लाल रंगाचा बँड बांधण्यात आला होता. याशिवाय कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि इतर सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या रंगाचे बँड बांधण्यात आले होते. या पद्धतीने अंबानींच्या लग्नात सुरक्षेची काळजी घेण्यात आली होती अशी माहिती ‘इंडिया टुडे’ने दिली आहे.
दरम्यान, अनंत-राधिकाचा हा भव्य विवाहसोहळा १२ जुलै रोजी पार पडला. यानंतर १३ जुलैला शुभ आशीर्वाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच रविवारी अनंत-राधिकाच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी पार पडली.
© IE Online Media Services (P) Ltd