Seema Ghogale On Why She Not Working Right Now: अभिनेत्री सीमा घोगळे ‘इंद्रायणी’, ‘आई कुठे काय करते’, ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’, ‘गोठ’, या मालिकांतून घराघरांत पोहोचली. तिच्या भूमिकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाल्याचे पाहायला मिळाले.

सीमा घोगळेने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत सध्या ती काम का करत नाही याबद्दल तिने वक्तव्य केले. तसेच, मानधनाबद्दलदेखील तिने तिची भूमिका स्पष्ट केली.

त्या मालिकेनंतर मी वर्षभर थांबले आहे, कारण….

अभिनेत्री म्हणाली, “सध्या मी काम करत नाहीये. चांगल्या भूमिकेसाठी आणि चांगल्या मानधनासाठी मी थांबले आहे. ‘आई कुठे काय करते’मधील माझं जे पात्र होतं ते दोन-अडीच वर्षांनी थांबलं होतं. म्हणजे शेवटची दोन वर्षे मालिकेत नव्हते. त्यानंतर मी ‘बॉस माझ्या लाडाची’ या मालिकेतदेखील काम केलं. त्यानंतर आता वर्षभरापूर्वी कलर्स मराठी वाहिनीवरील ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’ या मालिकेत काम केले. त्या मालिकेनंतर मी वर्षभर थांबले आहे, कारण चांगल्या भूमिकेसाठी विचारणा होत नाही. चांगल्या भूमिका आल्या तर चांगलं मानधन मिळत नाही.

मला आता वाटतं, मला माझ्या कामानुसार मानधन मिळायला हवं. मला खूप मोठं मानधन मिळावं असं मला वाटत नाही. मला माझी कुवत माहिती आहे, कारण आता नऊ वर्षे झाली, मी मालिकांमध्ये काम करत आहे. त्याआधी मी १७ वर्षे फक्त व्यावसायिक नाटक केलं आहे. म्हणजे १३-१४ व्यावसायिक नाटकं, साधारण साडेचार हजार ते पाच हजार प्रयोग झालेले आहेत. त्यानंतर मी मालिकांमध्ये काम करत आहे.

“त्याच मानधनात मी आजही काम करावं असं लोकांना वाटतं”

२०१७ साली माझ्या पहिल्या मालिकेला जितकं मानधन होतं, त्याच मानधनात मी आजही काम करावं असं लोकांना वाटतं. ते सांगतात की आमचं बजेट इतकंच आहे. मला बऱ्याच ठिकाणी सांगण्यात आलं की, मागच्या मालिकेला तुम्हाला जे मानधन होतं ना तेच इथेही मिळेल. पण, मला असं वाटतं की प्रॉ़डक्शन वेगळं, जागा वेगळी, भूमिका वेगळी सगळ्याच गोष्टी वेगळ्या, मग मानधन तितकंच का दिलं जातं?

पुढे अभिनेत्री असेही म्हणाली की, त्यांची टेक्निकल कारणं काय आहेत, त्याची गणितं मला माहीत नाही. पण, माझ्या बाबतीत असं होतं की एका कामातून दुसरं काम मला मिळतं. मी जेव्हा माझी पहिली मालिका ‘खुलता कळी खुलेना’ ही केली होती, त्याचं मानधन किती मिळणार, याबद्दल मला माहीत नाही. त्यानंतर ‘गोठ’ मालिकेतदेखील तसंच झालं. पहिल्या दोन्ही मालिकांच्यावेळी मी मध्येच एन्ट्री केली होती, त्यामुळे मला बरे पैसे मिळाले होते.

सोनी मराठी वाहिनीवरील कोठारे व्हिजनची ‘एक होती राजकन्या’ या मालिकेत मी पहिल्या दिवसापासून होते. ऑडिशन, लूक टेस्ट या सगळ्यातून गेले होते. तेव्हा पहिल्यांदा वेळ आली की मला माझं मानधन ठरवायचं आहे, तर मला कळेना बोलायचं काय असतं? कारण मला माहीत नव्हतं. मग त्यावेळी मला सांगण्यात आलं की, मध्येच जेव्हा मालिकेत एखादं पात्र येतं तेव्हा मालिका सेट असते. पण, टीआरपी किंवा इतर गोष्टी बदलेल्या असतात. म्हणजे बजेट ठरलेलं असतं. आता जास्तीच्या लोकांसाठी वेगळं बजेट असतं, त्यामुळे ते अॅडजेस्ट होतं.

साधारण आपण ज्या प्रोसेसमधून गेलेलो आहे, त्यानुसार आपल्याला वाटतं की दहा दिवस काम करून जेवढं मिळणार आहे, तेच फक्त वीस दिवस काम करून मिळणार आहे.

त्या भीतीने जे प्रोजेक्ट…

पुढे अभिनेत्री म्हणाली, “ती मालिका संपली तेव्हा मी वेगळी राहायला लागले होते. घर भाड्याने घेऊन राहत होते, त्यामुळे मालिका संपली तर भाड्याचे पैसे कुठून येणार ही भीती होती. त्या भीतीने जे प्रोजेक्ट आलं, ते घेतलं, त्यावेळी मला गरज वाटत होती. मला स्वत:ची ओळख निर्माण करायची होती.

आता मी जरा बरं काम करते, असं मला वाटतं. जरा बऱ्या गोष्टी मला कळायला लागल्या आहेत, त्यामुळे आता इतकी वर्षे काम केल्यानंतर मला वाटतं की मी थोडं थांबेन. जरा बरे पैसे मिळाले पाहिजे, कारण मालिका लोकांपर्यंत पोहोचेपर्यंत तीन महिने लागतात. एकदा तुमच्या पात्राची ओळख झाली की त्याच्यानंतर १० दिवसांत तुमचे तीस दिवस काढले जातात, ते कळत नाही. तेच गणित जे २५ दिवसांच्या पगाराचं होतं, ते १० दिवसावर येतं, त्यामुळे असं वाटतं की, ठरवून जाऊया आता १० दिवसच काम करायचं आहे. मग निदान एक ठराविक आकडा आपल्याला मिळावा म्हणून मी मानधनासाठी थांबली आहे. मी १० दिवसांच्या हिशोबाने काम बघतेय, २५ दिवसांच्या नाही.”

स्मिता घोगळे असेही म्हणाली की, मला असं कळलंय की इतकी वर्षे काम केल्यानंतर मलाच माझ्यासाठी बोलावं लागणार आहे; दुसरं कोणी येणार नाही. दरम्यान, आता अभिनेत्री कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.