Vikas Sethi Death: ‘क्योंकि सास भी कभी बहू,’ ‘कहीं तो होगा’ आणि ‘ससुराल सिमर का’ या मालिकांसाठी ओळखला जाणारा लोकप्रिय टीव्ही अभिनेता विकास सेठीचे निधन झाले आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने विकासची प्राणज्योत मालवली. तो ४८ वर्षांचा होता. शनिवारी रात्री झोपेतच हृदयविकाराचा झटका आला आणि नाशिकमध्ये त्याचे निधन झाले. त्याच्या निधनाच्या बातमीने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.
विकास सेठीच्या पार्थिवावर आज सोमवारी (९ सप्टेंबर) मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. आता त्याची पत्नी जान्हवी सेठीने पीटीआयशी बोलताना पतीच्या शेवटच्या क्षणांबद्दल सांगितलं. एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी विकास पत्नी जान्हवी व कुटुंबाबरोबर नाशिकला गेला होता.
जान्हवीने केलेली विकासच्या निधनाची पोस्ट
“आम्ही नाशिकला माझ्या आईच्या घरी पोहोचलो. त्याला उलट्या झाल्या आणि अतिसाराचा त्रास होत होता. त्याला दवाखान्यात जायचं नव्हतं म्हणून आम्ही डॉक्टरांना घरी बोलावलं. रविवारी सकाळी ६ वाजता मी त्याला उठवायला गेले तेव्हा त्याचं निधन झालं होतं. डॉक्टरांनी त्याला तपासलं आणि आम्हाला सांगितलं की रात्री झोपेत हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं,” असं जान्हवीने सांगितलं.
विकास सेठीचे पार्थिव मुंबईच्या कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती जान्हवीने दिली. विकासवर आज मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. विकासपश्चात त्याची पत्नी आणि जुळी मुलं आहेत. ही जुळी मुलं अवघ्या तीन वर्षांची आहेत. त्यांचा जन्म २०२१ मध्ये झाला.
विकासने अनेक टीव्ही मालिका केल्या आहे, त्याचबरोबर त्याने करीना कपूरसह ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात काम केलं होतं. त्याने करीनाचा मित्र रॉबीची भूमिका केली होती. याशिवाय त्याने दीपक तिजोरीच्या वादग्रस्त ‘उप्स’ चित्रपटात काम केलं होतं.
© IE Online Media Services (P) Ltd