Bigg Boss Fame Actress Breaks Silence On Divorce Rumors : कलाविश्वातून अनेकदा प्रसिद्ध जोडप्याने लग्नाच्या अवघ्या काही वर्षातच घटस्फोट घेतला किंवा वेगळं होण्याचा निर्णय घेतला अशा बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. गेल्या काही दिवसांपासून अशाच एका टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध जोडीने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चा सुरू होत्या. अशातच आता या अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करत यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत याबाबत वक्तव्य केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडी ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट यांच्या घटस्फोटाबद्दल चर्चा सुरू होत्या. या जोडीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला अशा अनेक अफवा सोशल मीडियावरून पसरवल्या जात होत्या. आता ऐश्वर्या शर्माने सोशल मीडियामार्फत यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे.
ऐश्वर्या इन्स्टाग्रावर स्टोरी पोस्ट करत म्हणाली, “मी गेल्या अनेक दिवसांपासून शांत आहे. पण, याचा अर्थ असा नाही की मी कमजोर आहे. माझ्याबद्दल तुम्ही सगळे ज्याप्रकारे मी कधीही न बोललेल्या गोष्टी लिहित आहात आणि खोट्या अफवा पसरवत आहात ते माझ्यासाठी खूप त्रासदायक आहे. त्यामुळे मला स्पष्ट करायला आवडेल की, मी कोणत्याही मुलाखतीमध्ये किंवा कुठेही याबाबत बोलले नाहीये आणि जर तुम्हाला वाटतंय की मी बोलले आहे तर मला त्याचे पुरावे दाखवा; नाहीतर या अफवा पसरवणं बंद करा.”
ऐश्वर्या पुढे म्हणाली, “माझं आयुष्य तुमचं मनोजन व्हावं यासाठी नाहीये आणि मी शांत आहे म्हणजे माझ्याबद्दल काहीही बोलण्याची मी कोणालाच परवानगी दिलेली नाही, त्यामुळे माझ्या नावाचा चुकीचा वापर करणं बंद करा आणि हे विसरू नका की, जर एखादी व्यक्ती शांत असेल तर याचा अर्थ असा नाही की, त्याच्याकडे बोलण्यासाठी काही नाही याउलट त्यांना कुठलाही वाद, भांडण यापेक्षा शांतता म्हत्त्वाची वाटते.”
दरम्यान, ऐश्वर्या शर्मा व नील भट्ट यांनी ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘गुम है किसे के प्यार में’ या हिंदी मालिकेत एकत्र काम केलं होतं. या मालिकेमुळे ते खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आले. या मालिकेच्या सेटवर ही जोडी एकमेकांच्या प्रेमात पडली आणि पुढे २०२१ रोजी ऐश्वर्या आणि नील यांनी लग्न केलं. त्यानंतर ही जोडी ‘बिग बॉस’मध्ये झळकली होती. या कार्यक्रमादरम्यान हे दोघे अनेकदा चर्चेत असायचे.