Navri Mile Hitlerla Fame Actress Shares Photos: ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका नुकतीच संपली आहे. मालिका संपल्यानंतर अनेक कलाकार त्यांच्या भावना व्यक्त करताना दिसले. आता अभिनेत्री सानिका काशिकरने मालिकेतील कलाकारांबरोबर काही फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्री सानिका काशिकरने सोशल मीडियावर नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील कलाकारांबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. काही फोटो मालिकेतील सीनदरम्यानचे आहेत, काही फोटो हे मेकअप रूममधील, तर काही कार्यक्रमादरम्यानचे फोटो दिसत आहेत.
सानिका काशिकर म्हणाली…
वल्लरी विराज, भूमिजा पाटील, भारती पाटील, शर्मिला शिंदे, शीतल क्षीरसागर, मिलिंद नंदा, आलापिनी, प्रसाद लिमये आणि मालिकेतील इतर कलाकार या फोटोंमध्ये दिसत आहेत.
हे फोटो शेअर करताना सानिका काशिकरने, ‘मला नवीन कुटुंब मिळाले’, अशी कॅप्शन दिली आहे. त्यावर मालिकेतील व इतर कलाकारांनीदेखील अनेक कमेंट्स केल्याचे पाहायला मिळत आहे. भूमिजा पाटीलने लिहिले, “मैं तेरी वहिनी, तू मेरी वहिनी, माझी लक्ष्मी वहिनी”, यावर सानिका काशिकरने उत्तर देत लिहिले, “माझी सरू.”
अभिनेत्री शर्मिला शिंदेनेदेखील कमेंट केली आहे. अभिनेत्रीने लिहिले, “तेरा यार हूँ मैं. मी कायम तुझ्याबरोबर आहे.” त्यावर सानिकाने ‘वहिनी’, अशी कमेंट केली आहे. या मालिकेत कालिंदी भूमिका साकारणाऱ्या शीतल क्षीरसागरनेदेखील अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट केली आहे. अभिनेत्रीने पूर्वा शिंदेनेदेखील कमेंट केल्याचे पाहायला मिळत आहे.
कलाकारांबरोबरच अनेक चाहत्यांनीही या पोस्टवर कमेंट केल्याचेदेखील पाहायला मिळत आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “खूप सुंदर. आम्हाला लक्ष्मीची आठवण येईल.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “तुमच्याबरोबरच आम्हालादेखील कुटुंब मिळालं.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “माझे आवडते कलाकार आणि आवडती मालिका.” एका नेटकऱ्याने लिहिले, “खरंच, आम्हाला तुमची खूप आठवण येत आहे. तुम्ही परत सगळे एकत्र या”, अशा कमेंट्स केल्याचे पाहायला मिळत आहेत.
नवरी मिळे हिटलरला या मालिकेत सानिका काशिकरने लक्ष्मी ही भूमिका साकारली होती. भूमिजा पाटीलने सरस्वती, तर शर्मिला शिंदेने दुर्गा ही भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तर, अभिनेत्री वल्लरी विराजने लीला ही भूमिका साकारली होती. अभिनेता राकेश बापट हा एजे या भूमिकेत दिसला होता. वर्षभराहून अधिक काळ या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
दरम्यान, आता या मालिकेतील कलाकार कोणत्या भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.