Aishwarya Narkars Name Before Marriage: मराठी सिनेमात विविध धाटणीच्या भूमिका साकारत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांना चकित केले. त्या सोशल मीडियावरदेखील सक्रिय असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावरील रील्स, फॅशनशी संबंधित व्हिडीओ यामुळे त्यांचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला. अविनाश नारकर व त्यांच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्या नारकर यांचे लग्नाआधी नाव वेगळे होते, लग्नाच्या वेळी त्यांनी आधीचे नाव बदलण्याचा निर्णय का घेतला, यावर अविनाश नारकर यांनी वक्तव्य केले आहे.

ऐश्वर्या नारकरांनी का बदललं नाव?

अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर यांनी नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अविनाश नारकर म्हणाले, “तुमच्या जोडीदाराबरोबर जगताना तो कशा पद्धतीने जगतोय, तो कुठे काय बोलतोय, तो आपल्याविषयी काय बोलतोय या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.”

पुढे पत्नी ऐश्वर्या नारकर यांच्याबद्दल अविनाश नारकर म्हणाले, “एका मुलाखतीत तिला विचारलं की, ऐश्वर्या तू नाव का बदललंस? सगळे तुला पल्लवीच म्हणतात. त्यावर तिनं दिलेलं उत्तर ऐकून माझ्या डोळ्यांत टचकन पाणी आलं. कारण- मला ती गोष्ट माहीत नव्हती. ती म्हणाली होती की, माझं आतापर्यंतचं जे अस्तित्व होतं, जगणं होतं, ते आता पूर्णपणे वेगळं होणार आहे. तर ते नावासह होऊ दे. मला वेगळ्या पद्धतीनं जगता येऊ दे, म्हणून अविनाशला सांगितलं होतं की माझं नाव बदलायचं.”

“ती मला म्हणाली होती की, पल्लवी तू म्हण; पण तू दुसरं काहीतरी नाव ठेव. आता ऐश्वर्या हे नाव माझ्या बहिणीनं सांगितलं होतं. मी हे ऐश्वर्याला सांगितलं की, बहिणीनं अमुक हे नाव सांगितलं आहे. त्यावर ती ते नाव ठेव, असं म्हणाली.”

“ऐश्वर्यानं त्या मुलाखतीत सांगितलं की, यामध्ये दोन गोष्टी घडल्या. एक तर पहिली गोष्ट मी स्वत: अविनाशला सांगितलं की, नाव बदल. कारण- मला तो बदल हवा होता. तर त्यानं बहिणीला जे नाव आवडतं, ते नाव ठेवलंय. त्यामुळे मी त्या घराचं माप ओलांडण्याआधीच मी त्या माणसांना आपलंस करून घेतलं होतं की, जे तुमचं आहे, ते मी स्वीकारलेलं आहे. हा जो स्वीकार आहे ना, तो खूप महत्त्वाचा असतो”, असे म्हणत ऐश्वर्या नारकर यांचं लग्नाआधी पल्लवी असं नाव होतं. लग्नात त्यांनी नाव बदललं तसेच त्यामागे काय कारण होतं, यावरदेखील अविनाश नारकर यांनी वक्तव्य केलं.

दरम्यान, अविनाश नारकर सध्या पुरुष या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यामध्ये शरद पोंक्षे प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच अविनाश नारकर ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why aishwarya narkar changed her name know popular actress name before marriage nsp