मुलांच्याच आयुष्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करणारा, पालक आणि मुलांमधील संवादाचं महत्त्व पटवून देणाऱ्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आमिर खानने २००७ साली केलं होतं. त्यानंतर ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाची निर्मिती केली. आता तो पुन्हा एकदा लहान मुलांनाच एकत्र घेऊन केलेला ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येतो आहे. यानिमित्ताने, बोलताना लहान मुलांवरील चित्रपटांना प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद मिळतो हा गैरसमज हिंदी चित्रपटसृष्टीत दृढ झाला आहे, असं सांगतानाच आपल्याकडे लहान मुलांच्या गोष्टी सांगणाऱ्या चित्रपटांची निर्मिती अधिक व्हायला पाहिजे, असं मत आमिरने व्यक्त केलं.
‘सितारे जमीन पर’ या २० जूनला प्रदर्शित होत असलेल्या चित्रपटाच्या निमित्ताने प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना त्याने लहान मुलांवरच्या चित्रपटांची आवश्यकता का आहे याविषयी सविस्तर मत मांडलं. ‘सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत लहान मुलांवर फार कमी चित्रपट बनतात. सध्याची लहान मुलं अनेक परदेशी भाषांमधील विविध कलाकृती मोठ्या प्रमाणात पाहतात, हिंदीमध्ये डब केलेल्या परदेशी कलाकृतीही मुलं पाहतात. हेच लक्षात घेऊन आपण त्यांच्यासाठी खास भारतीय धाटणीतील चित्रपटांची निर्मिती केली तर लहान मुलं आणि त्यांच्या पालकांच्या प्रतिसादामुळे चित्रपटसृष्टीची आर्थिक बाजू भक्कमच होईल’ असा स्पष्ट मुद्दा आमिरने मांडला. भविष्यात ‘महाभारता’वर काही तरी मोठं करण्याची इच्छा असल्याचं आणि त्याविषयी सर्व गोष्टी निश्चित ठरल्या की त्याविषयी अधिकृतरीत्या माहिती देण्याचं आश्वासनही त्याने दिलं.
विशेष मुलांमुळे सेटवर सकारात्मक ऊर्जा आणि चैतन्यमय वातावरण मी गेली ३० ते ३५ वर्षे सर्वसाधारण माणसांसोबत काम करत आलो आहे. ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाच्या निमित्ताने विशेष मुलांसोबत काम करण्याची संधी मिळाली, मात्र या चित्रपटात विशेष मुलांनीही सर्वसाधारण कलाकारांप्रमाणेच काम केलं आहे. या सर्व मुलांमुळे सेटवर एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती. अनेकदा सेटवरील तंत्रज्ञांमध्ये छोटे – मोठे वाद होतात, पण ‘सितारे जमीन पर’ चित्रपटादरम्यान कोणतेही वाद झाले नाहीत. कारण या विशेष मुलांच्या सहवासामुळे सर्व कलाकार व तंत्रज्ञ ताणतणाव विसरून जायचे, अशी आठवण आमिरने सांगितली. ‘आपल्याकडे आयुष्यात सगळ्या गोष्टी असल्या तरी आपण छोट्या छोट्या गोष्टींवरून दु:खी होतो, नाराज असतो, मात्र ही मुलं कोणत्याही क्षणी आनंदी असतात, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत खूश राहायचं, हे मी या मुलांकडून शिकलो आहे, असंही त्याने सांगितलं.
चित्रपट दर्जेदार असायला हवा…
चित्रपट कधी – कुठल्या तारखेला प्रदर्शित होतो आहे, यावर त्या चित्रपटाचं यश-अपयश अवलंबून नसतं, असं स्पष्ट मत आमिरने व्यक्त केलं. ‘माझा ‘लगान’ हा चित्रपट १५ जून २००१ रोजी प्रदर्शित झाला होता, मात्र तरीही त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. एप्रिल – मे हा सुट्टीचा हंगाम सोडून जून महिन्यात चित्रपट प्रदर्शित केले म्हणून ते अपयशी होत नाहीत. दरवर्षी बहुसंख्य चित्रपटांची निर्मिती होत असते आणि काही प्रक्रियांना वेळही लागतो, त्यामुळे नेहमी सुट्टीच्या हंगामात चित्रपट प्रदर्शित करू शकत नाही. ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट पूर्ण झाला, तेव्हा आम्हाला प्रदर्शनासाठी सर्वात जवळची तारीख जून महिन्यातलीच मिळाली. त्यामुळे चित्रपट २० जून २०२५ रोजी प्रदर्शित करण्याचं निश्चित केलं. माझ्या मते ज्या चित्रपटाचा आशय उत्तम आणि दर्जेदार आहे, तो चित्रपट पाहायला प्रेक्षक चित्रपटगृहात केव्हाही येणारच, असा विश्वास आमिर खानने व्यक्त केला.
चुका व अपयशांमधून शिकलो
मला आजवर सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक व कलाकारांबरोबर काम करायला मिळालं असून या सर्व चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसंच माझं संपूर्ण कुटुंब, आई – वडील, भावंडं, मुलं आणि पत्नी रीना व किरण या सर्व महत्त्वाच्या माणसांनी मला वेळोवेळी सहकार्य केलं आहे. एक माणूस म्हणून माझ्याकडून अनेकदा चुका झाल्या आहेत आणि या चुकांमधूनच खूप काही शिकायला मिळालं आहे. आपण नेमकं काय चुकलो? हे समजून घेता आलं. परिणामी चुका व अपयशांपासून शिकून यशाची चव चाखतो आहे, असं आमिर खान यांनी सांगितलं.
तरुण मंडळींनी समुपदेशन घेणं महत्त्वाचं
मी गेल्या काही वर्षांपासून समुपदेशन घ्यायला सुरुवात केली. त्यातूनच आपलं सुख व आनंद आपल्याच हातात असतो, ही बाब माझ्या लक्षात आली. एखाद्या व्यक्तीची आयुष्यभरासाठी निवड करणं, हा सर्वात महत्त्वाचा व मोठा निर्णय असतो. तुम्ही चुकीचा जोडीदार निवडल्यास, नात्याच्या प्रवासात निराशाजनक वातावरण निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. तुम्हाला नातं चांगल्या पद्धतीने टिकवायचं असल्यास प्रामाणिकपणे वागणं महत्त्वाचं आहे. तसंच, तुम्हाला समुपदेशनातून तुमच्यातील गुण आणि दोषांची जाणीव होते. त्यामुळे समुपदेशन सुरू केल्यास व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टी योग्य वयात कळतील. यासाठी तरुण मंडळींनी समुपदेशन घेणं गरजेचं आहे, असंही त्याने स्पष्ट केलं.
चित्रपटगृहातील प्रतिसादच माझ्यासाठी महत्त्वाचा…
‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट यूट्यूब व ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणार अशी चर्चा सुरू आहे. ही चर्चा आपणही ऐकली आहे, असं आमिरने सांगितलं. मात्र त्यात काही तथ्य नसून हा चित्रपट फक्त चित्रपटगृहातच प्रदर्शित केला जाणार असल्याचं त्याने सांगितलं. ‘आजवर माझे विविध चित्रपट प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन पाहिलं आणि त्यामुळेच मी आज यशस्वी स्थानी आहे. यूट्यूब व ओटीटी माध्यमावर चित्रपट प्रदर्शित न करून मी एक मोठी चूक करतो आहे, असं वाटू शकतं, पण मी चित्रपट या कलेवर खूप विश्वास ठेवतो आणि प्रामाणिकपणे काम करतो. त्यामुळे सध्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटगृहातच प्रदर्शित करण्याचा विचार आहे. सध्या चित्रपटगृहातील व्यवसायाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही आहे, पण माझा प्रेक्षकांवर विश्वास आहे, चित्रपटगृहात कलाकृती प्रदर्शित करून या व्यवसायाला नवसंजीवनी द्यायची आहे. अनेक निर्माते हल्ली जोपर्यंत चित्रपट ओटीटी माध्यमासाठी विकला जात नाही, तोपर्यंत चित्रपटगृहात प्रदर्शित करत नाहीत. मला मात्र सर्वप्रथम चित्रपट चित्रपटगृहातच प्रदर्शित करायचा आहे’, असं त्याने सांगितलं. देशातील काही जिल्ह्यांमध्ये एकपडदा चित्रपटगृहे नाहीत, त्यामुळे लोकसंख्येच्या अनुषंगाने चित्रपटगृहांची संख्या वाढली पाहिजे, असंही त्याने सांगितलं.