अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांचे सरकार कोसळले असून तालिबानने काबूलचा ताबा घेतला आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी युद्धग्रस्त देश ताब्यात घेतला आहे. तालिबानी दहशतवादी रविवारी काबूलमध्ये घुसले व त्यानंतर घनी यांचे सरकार कोसळले. त्यामुळे घनी यांच्यासह नागरिक व परदेशी व्यक्ती यांना देश सोडावा लागला. त्यामुळे अफगाणिस्तानातील बहुतांश दूतावास रिकामे करण्यात आले असून तेथील नागरिक आणि कर्मचाऱ्यांना परत नेण्यासाठी अनेक देशांनी काबूल विमानतळावर विमाने पाठवली आहेत. असं असतानाच अफगाणिस्तानमध्ये २०० भारतीय नागरिक अडकून पडल्याची माहिती समोर येत असून त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली जातेय. मात्र आता संपूर्ण जगामध्ये चर्चेत असणाऱ्या या विषयावरुन भाजपाचे नेते निलेश राणे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या प्रकरणावरुन एक इशारा दिलाय.
नक्की वाचा >> “तालिबान अफगाणिस्तानमधील भारतीयांना लक्ष्य करणार नाही कारण त्यांना माहितीय, मोदीजी…”
अफगाणिस्तानमधील घडमोडींच्या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी मुंबईमधील दहशतवादी स्लीपर सेल्ससंदर्भात चिंता व्यक्त करत राज्य सरकारकडे प्रकरण गंभीरतेने हाताळण्याची विनंती केलीय. “महाराष्ट्राला जास्त सतर्क राहण्याची गरज आहे. तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतला ही बाब भारतासाठी चांगली नाही. अनेक चर्चा होतात की मुंबईत दहशतवाद्यांचे स्लीपर सेल्स आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने आणि गांभीर्याने हा विषय हाताळावा,” असं निलेश राणे म्हणालेत. तसेच ट्विटच्या शेवटी, “नंतर सांगतील केंद्राने कळवलं नाही,” असं म्हणत राज्य सरकारला खोचक टोला लगावला आहे.
महाराष्ट्राला जास्त सतर्क राहणं गरजेचं आहे, तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतला ही बाब भारतासाठी चांगली नाही. अनेक चर्चा होतात की मुंबईत दहशतवाद्यांचे sleeper cells आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी तातडीने आणि गंभीरतेने हा विषय हाताळावा, नंतर सांगतील केंद्राने कळवळं नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 17, 2021
नक्की पाहा >> Video : तालिबानने ISIS आणि ‘अल-कायदा’च्या ५ हजार दहशतवाद्यांना तुरुंगातून दिलं सोडून
‘भारत आपल्या अफगाण भागीदारांच्या पाठीशी’
नवी दिल्ली : अफगाणिस्तानात तालिबान्यांनी सत्ता हस्तगत केल्यानंतर भारताने प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘‘भारत आपल्या अफगाण भागीदारांच्या पाठीशी उभा राहील’’, असे भारताने म्हटले आहे. तेथील भारताच्या हिताचे रक्षण केले जाईल. तसेच भारतात परतण्याची इच्छा असलेल्या तेथील हिंदू आणि शीख नागरिकांना परत आणले जाईल, अशी ग्वाही परराष्ट्र खात्याने दिली.
नक्की वाचा >> अफगाणिस्तान संघर्ष : जो बायडेन यांचं राष्ट्राला उद्देशून भाषण; म्हणाले, “अफगाणी नेत्यांनी…”
जगाने एकत्र यावे..
अफगाणिस्तानातील जागतिक दहशतवादाच्या धोक्याशी लढण्यासाठी जगाने एकत्र यावे, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अन्तोनिओ गटेरस यांनी केले. ती भूमी पुन्हा दहशतवाद्यांसाठी स्वर्ग ठरू नये, असे ते म्हणाले.
नक्की वाचा >> अफगाणिस्तान : देशात अराजकता… मात्र महिलांसंदर्भातील ‘या’ एका उद्योगाला आले सुगीचे दिवस
अमेरिका पाठवणार सहा हजार सैनिक
अमेरिका व मित्र देशांच्या नागरिकांना काबूलमधून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अमेरिका सहा हजार सैनिक पाठवित आहे. काबूलचा आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यावसायिक उड्डाणांसाठी बंद करण्यात आला असून अफगाणिस्तान सोडून जाणाऱ्यांसाठीच फक्त तो खुला राहिला आहे.