Air India Flight veers off runway during landing at Mumbai airport : एअर इंडियाचे विमान एआय २७४४ ए३२० (व्हीटी-टीवायए) हे सोमवारी मुंबई विमानतळावर उतरताना मुसळधार पावसामुळे ते धावपट्टीवरून भरकटल्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार विमान हे केरळमधील कोची येथून मुंबईला येत होते. खराब हवामानामुळे विमान हे धावपट्टीवर उतरल्याबरोबर लगेच घसरले. सुदैवाने यावेळी मोठा अपघात टळला असून दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हे विमान उतरत असताना त्याच्या तीन टायरांचा स्फोट झाला, इतकेच नाही तर इंजिनचे देखील नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. या प्रकारानंतरही विमान सुरक्षितरीत्या टर्मिनल गेटपर्यंत पोहचले आणि सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुखरूप बाहेर पडले.

एअर इंडियाने या घटनेबद्दल निवेदन जारी करून माहिती दिली आहे. २१ जुलै २०२५ रोजी कोचीहून मुंबई जाणारे विमान एआय२७४४ याला लॅडिंगदरम्यान मुसळधार पावसाचा सामना करावा लागला. धावपट्टीवर उतरताच विमान धावपट्टीवरून अयोग्यरित्या बाहेर पडले. मात्र विमान सुरक्षितपणे गेट पर्यंत पोहचले आणि त्यानंतर सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स खाली उतरले. तपासणीसाठी विमान ग्राउंड करण्यात आले आहे. प्रवासी आणि क्रू यांची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहेत, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले. विमान प्रशासनाकडून तात्काळ आपत्कालीन प्रतिसाद पथकांना बोलवण्यात आले.

विमानतळाच्या प्रवक्त्याने सांगितले की, सकाळी जवळपास ९.२७ वाजता ही घटना घडली. धावपट्टीवर झालेल्या या गटनेनंतर इमर्जन्सी टीम सक्रीय झाल्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सर्व प्रवासी व क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. एअरपोर्ट रनवेचे थोडे नुकसान झाले आहे. यादरम्यान दुसरा रनवे लगेच सक्रिय करण्यात आला.