अनिश पाटील
आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमवर विष प्रयोग करण्यात आल्याची अफवा सध्या चांगलीच चर्चेत आहे. मुंबई पोलिसांतील सूत्रांनी या माहितीचे खंडन केले आहे. यापूर्वीही दाऊदची हत्या करण्याचे प्रयत्न झाले होते. त्यासाठी छोटा राजन टोळीचे गुंड पाकिस्तानातही जाऊन आले. एकदा तर छोटा शकील पाकिस्तानात या गुंडांसमोर आला होता. पण कट दाऊदला मारण्याचा असल्यामुळे शकीलला त्यावेळी सोडून देण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 गुप्तहेर यंत्रणांनी दाऊदला पाकिस्तानात जाऊन मारण्याचा कट आखला होता. त्यासाठी फरीद तनाशा आणि विकी मल्होत्राला निवडले होते. त्यांना प्रशिक्षण देत पाकिस्तानात घुसवले. मात्र, प्रत्येकवेळी ही मोहीम दाऊदभोवती असलेल्या आयएसआयच्या पहाऱ्यामुळे फसली. मात्र या  मोहिमेदरम्यान छोटा शकील हा फरीद तनाशा व विक्कीच्या समोर होता. त्याला संपवण्याच्या तयारीत असताना राजनला त्याची माहिती देण्यात आली. राजनने शकीलपेक्षा दाऊद महत्त्वाचा असल्याचे त्यांना सांगितले. शकीलला त्याची कुणकुण लागताच त्याने पळ काढला. त्यानंतर विक्की आणि तनाशाने पाकिस्तानातून भारतात प्रवेश केला. त्यानंतरही दाऊदच्या हत्येसाठी ते दोघे पाकिस्तानात जाण्याच्या तयारीत असतानाच त्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे तत्कालीन उपायुक्तांच्या हाती लागली. त्याने छापेमारी करून विक्की, तनाशाला अटक केली.

हेही वाचा >>> ज्येष्ठांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांच्या उपाययोजना काय? पोलीस आयुक्तांकडून जाणून घेण्याची पार्लेकरांना संधी

यावेळी गुप्तहेर यंत्रणेचा अधिकारीही दोघांबरोबर होता. त्यांना नंतर सोडण्यात आले.  विक्रांत विशाल मल्होत्रा ऊर्फ विकी मल्होत्रा ऊर्फ विजयकुमार याचा जन्म बिहारचा. परंतु तो कुटुंबीयांसह कोलकात्याला स्थायिक झाला. त्याला १९९० मध्ये मुंबईत नोकरी मिळाली आणि तो मुंबईत आला. फारसा शिकलेला नसल्यामुळे तो कुलाबा येथे एका इराणी हॉटेलात वेटरचे काम करू लागला. पण त्या नोकरीतही अपेक्षेप्रमाणे पैसे मिळत नसल्यामुळे मग त्याने म्हाडाच्या बंद घरांवर अतिक्रमण करून ती भाडयाने देण्यास सुरुवात केली आणि त्याची पावले गुन्हेगारीकडे वळली. त्यावेळी डॅनी, वेणू गोपाळ, वासू, नंदू हे त्याचे विश्वासू साथीदार होते. विक्कीचे तेवढयावरच भागले नाही. सोने तस्करीमध्ये भरपूर पैसा असल्याचे त्याला समजले. त्यामुळे त्याने सोने तस्करी सुरू करण्याचा निर्णय घेतला.

घाटकोपर येथे ताडीमाडीचा व्यवसाय करणारा सुनील शेटे त्यावेळी सोने तस्करीत सक्रीय होता. रत्नाागिरीतील गुहागर परिसरातून सोन्याची तस्करीच्या ठिकाणी गवळी टोळीच्या अविनाश शेटये याचे वर्चस्व होते. त्याचा काटा काढल्यास तस्करीत हातपाय पसरवता येतील, एस सुनीलने विक्कीला सांगितले. त्यावेळी अविनाश शेटयेचा खून करण्यासाठी विक्की व वेणूगोपाळ दोघे रत्नागिरीला पोहोचले. त्यांनी अविनाश शेटयेचा खून केल्यानंतर तेथून पळ काढला. पण याप्रकरणी सुनीलला पोलिसांनी पकडल्यानंतर विक्कीचा सहभाग उघड झाला. त्यालाही पोलिसांनी अटक केली. नाशिक कारागृहात त्याची सुनील मडगावकर ऊर्फ माटयाबरोबर मैत्री झाली. माटयाने त्याचे छोटा राजनशी मोबाइलवर बोलणे करून दिले. विकीने कारागृहातून बाहेर पडल्यानंतर छोटा राजन टोळीसाठी काम करण्यास सुरूवात केली.

छोटा राजनच्या इशाऱ्यावरून त्याने दाऊद टोळीशी संबंधित दोन बांधकाम व्यवसायिकांना सांताक्रूझ येथे त्यांच्या कार्यालयाजवळ गोळया घालून ठार मारले. यावेळी विकीबरोबर बाब्या मयेकर, जन्या पासी हेही साथीदार होते. छोटा राजनच्या इशाऱ्यावरून विकी कुठेही घुसून कुणालाही मारायचा. त्यासाठी त्याला छोटा राजन महिन्याकाठी एक लाख रुपये हवालामार्फत पाठवायचा. पण ११ जुलै २००५ ला मुंबईतून दाऊदला ठार मारण्यासाठी पाकिस्तानात जात असताना विक्कीला दिल्लीत अटक झाली आणि दाऊदला मारण्याची मोहीम फसली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assassination attempts on dawood ibrahim global terrorist dawood ibrahim poisoned in karachi zws