मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्ग सोमवारी आणि मंगळवारी रात्री अंशतः बंद राहणार आहे. डांबरीकरणाच्या कामासाठी हा मार्ग बंद ठेवण्यात येणार असून, या काळात वाहनचालकांनी शक्यतो या मार्गावरून प्रवास करण्याचे टाळावे, असे पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
सोमवारी, दोन मे रोजी रात्री दहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत वांद्रे ते वरळी या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तर मंगळवारी, ३ मे रोजी वरळी ते वांद्रे या मार्गावरील वाहतूक रात्री दहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात मुंबई एंट्री पॉईंट्स लिमिटेड या कंपनीकडून मार्गावरील डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. २००९ मध्ये या सेतू मार्गावरून वाहतूक सुरू करण्यात आली होती. त्यानंतर पहिल्यांदाच डागडुजीच्या कारणांसाठी या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
या दोन्ही दिवशी रात्रीच्या वेळी वाहनचालकांनी माहीम कॉजवे, दादर, प्रभादेवी या मार्गाचा वापर करावा, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bandra worli sea link will be partially shut for traffic