मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिनानिमित्त आज मंत्रालय येथे ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी राष्ट्रध्वजाला वंदन करून सर्व उपस्थितांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच मागील एक वर्षात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची यादी वाचून दाखवली. तसेच शासन आपल्या दारी योजनेला क्रांतीकारी म्हटलं. ते मंगळवारी (१५ ऑगस्ट) मुंबईत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकनाथ शिंदे म्हणाले, “मागील वर्षभरात आपल्या सरकारने कुणालाही अभिमान वाटावा असे अनेक समाजहिताचे निर्णय घेतले आहेत. ते निर्णय सांगितले तर वेळ पुरणार नाही. असं असलं तरी काही निर्णयांचा उल्लेख करणं आवश्यक आहे. शासन आपल्या दारीसारख्या क्रांतीकारी योजनेत सव्वाकोटींपेक्षा अधिक लाभार्थ्यांना कोट्यावधी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. तो कार्यक्रम आणखी पुढेही सुरूच आहे. या योजनेचा लाभार्थी माझ्यासमोर येतो तेव्हा मला त्याच्या डोळ्यात जो आनंद दिसतो तेव्हा स्वातंत्र्याचा खरा अर्थ सापडतो.”

“शेतकऱ्यांना प्रसंगी नियमाबाहेर जाऊन मदत”

“आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी केवळ एक रुपयात पीक विमा योजना लागू केली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्यातील सर्वाधिक दीड कोटी शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात पीक विम्याचा लाभ घेतल्याची नोंद झाली आहे. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना प्रसंगी नियमाबाहेर जाऊन मदत केली आहे. आजपर्यंत साडेबारा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत बळीराजाला दिले आहेत,” अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.

“आता दरवर्षी प्रति शेतकऱ्याला १२ हजार रुपये मिळणार”

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत केंद्राच्या ६ हजार रुपयांमध्ये राज्यातर्फे आपण ६ हजार रुपये घातले आणि आता दरवर्षी १२ हजार रुपये प्रति शेतकऱ्याला मिळणार आहेत. एक कोटी १५ लाख शेतकरी कुटुंबांना हा लाभ मिळणार आहे. रखडलेल्या ३५ जलसिंचन योजना प्रकल्पांना आपण चालना दिली. त्यामुळे ८ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.”

हेही वाचा : पंतप्रधान मोदींचं लाल किल्ल्यावरून मणिपूर हिंसाचारावर भाष्य; म्हणाले, “आई-बहिणींच्या…”

“समुद्रात वाहून जाणाऱ्या कोकणातील नद्यांचं पाणी अडवण्यासाठी नदीजोड प्रकल्प”

“आपण जलयुक्त शिवार योजनाही पुन्हा सुरू केली आहे. समुद्रात वाहून जाणाऱ्या कोकणातील नद्यांचं पाणी अडवण्यासाठी आपण नदीजोड प्रकल्प हाती घेत आहोत. मराठवाडा वॉटर ग्रिडच्या माध्यमातून नद्यांचं पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपल्या सरकारने ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवासाची सुविधा दिली आहे. महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत दिली. कोट्यावधी लोकांना याचा फायदा झाला आहे,” असंही शिंदेंनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde independence day speech at ministry mumbai pbs