मुंबई : शिक्षण संचालनालयाकडून इयत्ता अकरावी प्रवेशाचा भाग २ भरण्यासाठी शनिवारी दुपारी १२.३० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जवळपास ७५ हजार २३८ विद्यार्थ्यांना भाग २ पूर्ण करून पहिल्या नियमित फेरीमध्ये सहभागी होता येणार आहे.

इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये पहिल्या फेरीसाठी अर्ज भरण्यासाठी २६ मे ते ५ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीमध्ये ५ जून २०२५ पर्यंत ११ लाख २९ हजार ९२४ विद्यार्थ्यांनी अर्ज (भाग १ व भाग २ ) भरले. तर जवळपास १ लाख ४१ हजार विद्यार्थ्यांना अर्ज भरणे शक्य झालेले नाही. यातील जवळपास ७५ हजार २३८ विद्यार्थ्यांनी भाग १ पूर्ण भरला असून त्यांनी दुसरा भाग भरलेला नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी ६ जून रोजी दुपारी १२.१५ ते ७ जून दुपारी १२.३० पर्यंत अर्जाचा भाग २ भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तरी विद्यार्थ्यांनी अर्ज भाग २ दिलेल्या वेळेत भरावा.

अशा विद्यार्थ्यांनी भाग २ न भरल्यास त्यांना प्रोव्हिजनल मेरिट लिस्टसाठी व पहिल्या फेरीत प्रवेशासाठी उच्च माध्यमिक विद्यालय देण्यासाठी ग्राह्य धरले जाणार नसल्याचे शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र यापूर्वी भाग २ भरलेल्या विद्यार्थ्यांना आपले पसंती क्रम बदलण्याची सुविधा यादरम्यान मिळणार नाही.

प्रत्येक फेरीच्या सुरुवातीला अर्ज भरण्याची सुविधा

ज्या विद्यार्थ्यांनी ५ जून २०२५ पर्यंत ऑनलाइन प्रवेशासाठी नोंदणी केलेली नाही किंवा आपला प्रवेश अर्ज भाग १ भरलेला नाही अथवा प्रवेश अर्ज अर्धवट भरला आहे व विहित मुदतीत अर्जाचा भाग १ पूर्ण करू शकले नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक फेरीच्या सुरुवातीला नव्याने प्रवेश अर्जाचा भाग १ व भाग २ भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी पुढील फेरीच्या वेळी आपले अर्ज वेळेत भरावेत. प्रत्येक फेरीपूर्वी नवीन विद्यार्थ्यांनाही आपला अर्ज भरण्याची सुविधा मिळणार आहे. प्रवेश फेरीच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.