मुंबई : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला होत असलेल्या विलंबामुळे विद्यार्थी हतबल झाले असताना आता पहिली गुणवत्ता यादी पुन्हा लांबणीवर पडणार आहे. तीन वेळा लांबणीवर जाऊन अखेरीस २६ जून रोजी जाहीर होणे अपेक्षित असणारी पहिली गुणवत्ता यादी आता पुन्हा रखडली आहे. ही यादी जाहीर होण्यास आणखी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष पुरते कोलमडण्याची शक्यता असल्याने पालकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला दरवर्षी विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता यंदा राज्य मंडळाने दहावीचे निकाल जवळपास १५ दिवस लवकर जाहीर केले. मात्र पहिल्या दिवसापासून निर्माण होत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे प्रवेश प्रक्रियेचा पुरता बोजवारा उडाला आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या सुरुवातीला निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना नोंदणीच्या टप्प्यावरच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. याच तांत्रिक अडचणीमुळे १० जून रोजी जाहीर होणारी पहिली गुणवत्ता यादी ही २६ जून रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले होते.

मात्र अल्पसंख्याक कोट्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर राज्य सरकारने काढलेल्या नव्या शासन निर्णयानुसार संकेतस्थळामध्ये काही बदल करावे लागणार आहेत. हे बदल करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे २६ जून रोजी जाहीर करण्यात होणारी पहिली प्रवेश यादी आता पुन्हा चार ते पाच दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण संचालक महेश पालकर यांनी सांगितले.

प्रवेश प्रक्रिया कशी लांबली?

  • अकरावी प्रवेश प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर २१ मेपासून अर्ज नोंदणीला सुरुवात करण्यात येणार होती. मात्र पहिल्याच दिवशी उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीमुळे अर्ज नोंदणी प्रक्रिया २६ मे पासून सुरुवात करण्यात आली. मात्र तांत्रिक अडचणी कायम राहिल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात वारंवार समस्या येत होती.
  • यावर मात करत अखेर ७ जून रोजी ऑनलाईन अर्ज नोंदणी पूर्ण झाली. परंतु तांत्रिक अडचणीचे शुक्लकाष्ठ कायम राहिल्याने १० जून रोजी जाहीर होणारी पहिली गुणत्तवा यादी लांबणीवर टाकण्यात आली. शिक्षण संचालनालयाने नव्याने वेळापत्रकानुसार जाहीर करून पहिली गुणवत्ता यादी १० जूनऐवजी २६ जून रोजी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता पुन्हा पहिली प्रवेश फेरी लांबणीवर गेली आहे.