मुंबई : भारतात १३० कोटी लोकसंख्येला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायाधीश मात्र अवघे २०,०७६ आहेत. देशभरातील न्यायालयात न्यायाधीशांच्या ३० टक्के जागा रिक्त असल्याचे भारत न्याय अहवालातून समोर आले आहे. पोलीस, न्यायव्यवस्था, तुरूंग आणि कायदेशीर मदत असे विविध घटक विचारात घेऊन तयार करण्यात आलेल्या या अहवालाचे मंगळवारी प्रकाशन झाले. त्यानुसार देशातील मोठय़ा राज्यांमध्ये न्यायदानात महाराष्ट्र अकराव्या स्थानी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशभरात कर्नाटक राज्य अव्वल ठरले आहे. टाटा ट्रस्टतर्फे भारतातील न्यायव्यवस्थेचा आढावा घेणारा ‘इंडिया जस्टिस रिपोर्ट’ प्रसिद्ध करण्यात येतो. यंदा या अहवालाचे तिसरे वर्ष आहे. सेंटर फॉर सोशल जस्टिस, कॉमन कॉज, कॉमनवेल्थ ह्युमन राइट्स इनिशिएटिव्ह, विधी सेंटर फॉर लीगल पॉलिसी आणि हाऊ इंडिया लिव्ह्स यांच्या सहकार्याने हा अहवाल प्रकाशित करण्यात येतो.

न्यायपालिकेमध्ये रिक्त जागा ही एक समस्या आहे. १.४ अब्ज लोकांसाठी, भारतात सुमारे २०,०७६ न्यायाधीश आहेत. उच्च न्यायालयातील न्यायधीशांच्या ३० टक्के जागा रिक्त आहेत. २८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रत्येक उच्च न्यायालयातील चार खटल्यांमागील एक खटला पाच वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहे असे अहवलात नमूद करण्यात आले आहे.

यंदाच्या अहवालानुसार एक कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या १८ मोठय़ा आणि लहान राज्यांमध्ये कर्नाटकमध्ये न्यायव्यवस्था अधिक सक्षम असल्याचे दिसते आहे. तामिळनाडू राज्य दुसऱ्या क्रमांकावर तर तेलंगणा राज्य हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरात राज्याला चौथे स्थान मिळाले असून आंध्र प्रदेश पाचव्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र अकराव्या स्थानी आह तर, उत्तरप्रदेश मोठय़ा राज्यांच्या क्रमवारीत शेवटच्या म्हणजे अठराव्या स्थानी आहे.

दरम्यान, एक कोटीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या सात लहान राज्यांमध्ये सिक्किम पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच या यादीत गोवा राज्य सातव्या म्हणजेच शेवटच्या क्रमांकावर आहे

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Judge india justice report sheds light on the state of the judiciary amy