राज्यातील अनेक तुरुंग हे ब्रिटिशकालीन आहेत. तसेच या तुरुंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. यातील जे तुरुंग आता वाढत्या नागरीकरणामुळे शहरांमध्ये आले आहेत त्या साऱ्याचा विचार करून तुरुंग निर्मितीसाठी आराखडा तयार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
सांगली येथील तुरुंगातून पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे दोन कैदी पळून गेल्याचा मुद्दा पतंगराव कदम व अमिन पटेल यांनी उपस्थित केला. तसेच राज्यात नव्याने तुरुंग निर्मितीची आवश्यकता असल्याने सरकार नवीन तुरुंग बांधणार का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. उत्तरादाखल मुख्यमंत्री म्हणाले, जोरदार पाऊस आणि वीज गेल्याचा फायदा घेत लॉकअपच्या जाळीवर चढून लाकडी पट्टय़ा असलेले छत फोडून हे कैदी पळाले. येथील व्यवस्था जुनी व लाकडी छत असल्याचा फायदा कैद्यांनी घेतला. या प्रकरणी दोनजणांना निलंबित करण्यात आले असून राज्यातील तुरुंगांमधील कैद्यांची संख्या, शहरी भागात येणारे तुरुंग तसेच जुन्या तुरुंगामध्ये आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था याचा विचार करून लवकरच एक आराखडा तयार केला जाईल.
एसटी अपघातातील मृतांच्या वारसांना दहा लाख
मुंबई : एसटी अपघातात मृत पावणाऱ्यांच्या वारसांना किमान दहा लाख रुपये मिळावे यासाठी लवकरच प्रस्ताव मांडण्यात येईल त्यामुळे अशा अपघातांमधील दावे कमी होतील, असे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.
धुळे-चाळीसगाव रस्त्यावर दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात एका कंटेनरची समोरून येणाऱ्या परिवहन विभागाच्या बसला धडक बसून वीस जण ठार तर वीस जण जखमी झाले असून या मार्गावर दुभाजक नसल्यामुळे वारंवार अपघात घडतात असा मुद्दा लक्षवेधीच्या माध्यमातून कुणाल पाटील, अमिन शेख आदींनी उपस्थित केला. अपघातातील मृतांच्या वारसदारांना अत्यल्प मदत मिळत असून न्यायालयात नुकसानभरपाईसाठी दावे दाखल करणाऱ्यांना स्टॅम्प डय़ुटी भरणे परवडत नसल्यामुळे किमान ही डय़ुटी माफ करावी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. धुळे-चाळीसगाव-कन्नड, शहागड-गेवराई-हीड-येडशी या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम नॅशनल अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने हाती घेतले आहे.