मुंबई : कृषी विभाग आणि एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन त्याचबरोबर ग्रामविकास विभाग आणि टाटा मोटर्स फाउंडेशन यांच्यात सोमवारी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. या करारांमुळे राज्यात शेती, महिला सक्षमीकरण, पोषण सुरक्षा आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांमध्ये विकासाचे नवे पर्व सुरू होत आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे हे सामंजस्य करार झाले. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य शासनामार्फत शेतीत नवनवीन प्रयोग करण्यास प्राधान्य दिले जात आहे. महिला शेतकरी हा शेती व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या सहभागातून आपण केवळ उत्पादन नव्हे तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम करू शकतो. पोषण सुरक्षा ही काळाची गरज असून शेतकऱ्यांना याचा लाभ मिळवून देत असताना भावी पिढ्यांच्या आरोग्यासाठीही हा उपक्रम उपयोगी ठरेल, असे फडणवीस यांनी सांगितले.
ग्रामविकास विभागाने टाटा मोटर्सशी केलेला सामंजस्य करार ग्रामीण विकासाला गती देणारा आहे. या कराराच्या माध्यमातून ६३ ग्रामपंचायतींमध्ये प्रभावी काम होईल आणि समृद्ध ग्राम मिशनला या सामंजस्य करारामुळे चालना मिळेल. गावांच्या शाश्वत विकासासाठी आणि गरिबी निर्मूलनासाठी या उपक्रमांमधून सक्षम पायाभूत रचना उभारली जाईल.
या सामंजस्य कराराच्या वेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव राजेशकुमार, कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. विकासचंद्र रस्तोगी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशनच्या डॉ. सौम्या स्वामिनाथन, टाटा मोटर्स मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
कृषी विभाग व एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशन यांच्यातील कराराचे ठळक मुद्दे :
* वातावरणीय बदल व पोषण मूल्यांचा विचार करता पारंपरिक व स्थानिक अशा भरड धान्यांच्या उत्पादन व प्रक्रिया शेती उद्योगांना प्रोत्साहन देणे.
* संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेल्या २०२६ या महिला शेतकरी वर्षानिमित्ताने महिला शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी कायद्याची निर्मिती. तसेच सावित्रीबाई फुले महिला शेतकरी सशक्तीकरण अभियानाची निर्मिती.
* पर्यावरणपूरक, पोषक, जैवविविधतेला प्रोत्साहन देणाऱ्या कृषी पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये बायोहॅपिनेस केंद्रांची निर्मिती.
टाटा मोटर्स फाऊंडेशन व ग्राम विकास विभाग यांच्यातील कराराचे ठळक मुद्दे :
* पालघर जिल्ह्यातील ६ ग्रामपंचायतींमध्ये एकात्मिक ग्राम विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणी नंतर राज्यभरातील ६३ ग्रामपंचायतींमध्ये (सुमारे १०० गावे) हा कार्यक्रम
* मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानास पूरक कार्यक्रम राज्यातील १० आकांक्षित तालुक्यांमध्ये रावविला जाईल.
* निवडलेल्या प्रत्येक गावात ३ वर्षांच्या कार्यक्रम कालावधीत ग्रामपंचायत व स्थानिक समुदायांच्या सक्षमीकरणातून गावांचा शाश्वत विकास साधणे
* विविध शासकीय योजना आणि कार्यक्रमांच्या तसेच टाटा मोटर्सच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हा कार्यक्रम राबवविला जाईल. शासकीय कार्यक्रमांच्या परिणामकारकतेत वाढ करण्याचे उद्दिष्ट * ग्राम विकास आराखडा तयार करणे, अंमलबजावणीचे सनियंत्रण व मूल्यमापन करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर