धारावीतील पर्यावरणपूरक केंद्राला अवकळा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धारावीमधील निसर्गरम्य स्थळ म्हणून ओळखळे जाणाऱ्या ‘महाराष्ट्र निसर्ग उद्याना’च्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने हे उद्यान कचराभूमी होण्याच्या मार्गावर आहे. उद्यानाच्या पूर्व सीमेला लागून असलेल्या नाईकनगर आणि प्रेमनगर या झोपडपट्टीतून मोठय़ा प्रमाणात कचरा उद्यानाच्या हद्दीत फेकला जात आहे. त्यामुळे पूर्वकडील हद्दीत कचऱ्याचे डोंगर उभे राहिलेले पाहायला मिळत आहेत.

धारावीत बांद्रे-शीव जोड रस्त्यावर ३७ एकर जागेत हे उद्यान वसलेले आहे. शहराच्या मध्यभागी हरित क्षेत्र असावे, या हेतूने ७०च्या दशकात या उद्यानाच्या पायाभरणीला सुरुवात झाली आणि १९९४ साली त्याचे लोकार्पण करण्यात आले. या उद्यानात पक्ष्यांच्या १२०, कोळ्यांच्या ३०, तर फुलपाखरांच्या ७५ प्रजाती अस्तित्वात आहेत. उद्यानात वृक्षसंपदा ही मोठय़ा प्रमाणावर आहे, परंतु सध्या उद्यानाला नव्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. उद्यानाच्या पूर्वकडील हद्दीत कचऱ्याचा डोंगर उभा झालेला पाहायला मिळत आहे. उद्यानाच्या पूर्व सीमेवरील संरक्षण िभतीची ठिकठिकाणाहून पडझड झाल्यामुळे बाजूच्या नाईकनगर आणि प्रेमनगर मधील रहिवाशांकडून मोठय़ा प्रमाणावर कचरा उद्यानाच्या हद्दीत फेकला जात आहे. या कचऱ्यात बांधकामातून निघालेल्या विटा-मातीचा राडा-रोडा पिशव्यांमध्ये भरुन उद्यानात टाकल्याने त्या पिशव्यांचा डोंगरच उभा राहिला आहे. तसेच त्यात प्लॉस्टिक, सिमेंटसारख्या अविघटनशील सामान असल्यामुळे उद्यानाच्या पर्यावरणाला आणि प्राणी संपत्तीलाही धोका निर्माण झाला आहे.

हे उद्यान मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) आधिपत्याखाली येते. उद्यान प्रशासनाकडे फक्त उद्यानाच्या पर्यावरण विकासासंबंधीचे अधिकार आहेत. उद्यान संरक्षणाचे सर्व अधिकार एमएमआरडीएकडे आहेत. संरक्षण िभतीची पडझड झाल्यामुळे तात्पुरता उपाय म्हणून एमएमआरडीएने सुरक्षारक्षकांची नेमणूक आणि पत्र्यांची शेड उभारली होती, पण ही शेडही आता निखळली आहे. उद्यानात १ जुलैला मुख्यमत्र्यांच्या हस्ते केलेल्या वृक्षारोपण क्षेत्रातच रहिवासी प्रात:विधीसाठी बसलेले दिसतात आणि त्यावर सुरक्षारक्षकांकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे.

उद्यानाच्या संरक्षणाची जबाबदारी एमएमआरडीएची आहे, तसेच उद्यान प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळही नाही. पडलेल्या पत्र्यांविषयी एमएमआरडीएला कळविले आहे, अशी प्रतिक्रिया उद्यानाचे संचालक अविनाश कुबल यांनी दिली. तर उद्यानाचे सर्व अधिकार महाराष्ट्र निसर्ग संस्थेकडे असल्याचे एमएमआरडीएचे जनसंपर्क अधिकारी दिलीप कवठकर यांनी सांगितले.

पत्र्यांची संरक्षण भिंतही कोसळली

उद्यानाच्या पूर्वेकडील हद्दीत मुख्यमंत्र्यांचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार असल्याने येथे तात्पुरती पत्र्यांची भिंत उभारण्यात आली, परंतु या पत्र्यांना कोणताही ठोस आधार न देता केवळ दोरखंडाने बांधून जमिनीत रुतवून उभे करण्यात आले होते. त्यामुळे दहा दिवसांतच जोरदार वाऱ्यामुळे पत्र्याची भिंत कोसळून गेली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra nature park covered by garbage