मुंबई : राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरला जाण्यासाठी ठिकठिकाणांहून तब्बल ५,२०० जादा बसगाड्या सोडल्या. त्यामुळे एसटीला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपये उत्पन्न मिळाले. त्याचबरोबर या जादा बसगाड्यांमधून तब्बल ९ लाख ७१ हजार ६८३ भाविक – प्रवाशांना पंढरपुरला पोहोचणे सुकर झाले, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले की, आषाढी यात्रेनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण राज्यातून पंढरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक-प्रवाशी जातात. या भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून पंढरपूरपर्यंत ने-आण करण्यासाठी एसटीने तब्बल ५ हजार २०० जादा बस सोडल्या होत्या. ३ ते १० जुलै दरम्यान या बसनी २१ हजार ४९९ फेऱ्या करून तब्बल ९ लाख ७१ हजार ६८३ भाविक-प्रवाशांची सुरक्षित ने-आण केली. यातून एसटी महामंडळाला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले.

मागील वर्षी मिळालेल्या उत्पन्नापेक्षा ते ६ कोटी ९६ लाख ३ हजार रुपयांनी जास्त आहे. आषाढी यात्रेनिमित्त २०२४ मध्ये सोडलेल्या जादा बसगाड्यांमुळे एसटीला २८ कोटी ९१ लाख ५८ हजार रुपये उत्पन्न मिळाले होते. एसटीला आर्थिक फायदा करून देणारे, तसेच लाखो भाविकांना पंढरपुरला सुखरुप ने-आण करणारे हजारो चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी व त्यांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक, अधिकारी अभिनंदन पात्र आहेत, असे प्रतिपादन सरनाईक यांनी केले.

हजारो एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था

आषाढी यात्रेच्या काळामध्ये पंढरपूरमध्ये येणाऱ्या एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांची जेवणाअभावी गैरसोय होऊ नये, म्हणून प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चातून ५, ६ व ७ जुलै रोजी मोफत जेवण, चहा-नाश्त्याची सोय केली होती. याचा फायदा हजारो एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला. याबद्दल सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी सरनाईक यांचे आभार मानले.