कुलदीप घायवट

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमधील गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी रेल्वे पोलिसांची तपास यंत्रणा चहूबाजूने शोध घेत आहे. आरोपी चेतन सिंह हा मूळचा उत्तर प्रदेश येथील असल्याने रेल्वे पोलीस उत्तर प्रदेशातील हाथरस येथे जाऊन सखोल तपास करण्याची शक्यता आहे. तसेच सीसीटीव्ही चित्रीकरण, एक्स्प्रेसमधील प्रवाशांची चौकशी, समाज माध्यमावर प्रसारित झालेल्या ध्वनिचित्रफितीची पडताळणी करून संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेवरील जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये आरोपी चेतन सिंह याने सोमवारी १२ गोळय़ा झाडल्या. त्यात चौघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्याला ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रकरण खूप गुंतागुतीचे असल्याने रेल्वे पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशमधील असल्याने त्याच्या गावी रेल्वे पोलीस जाऊन, प्रकरणाचे अधिक धागेदोरे शोधणार आहेत. तसेच एक्स्प्रेसमध्ये जेवढे प्रवासी होते, त्या प्रवाशांची विचारपूस करून त्याच्याकडून माहिती काढण्यात येणार आहे.

एक्स्प्रेसमधील सीसीटीव्ही चित्रीकरण हाती

जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये ज्या  डब्यात गोळीबार झाला तेथे सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. मात्र ‘बी ४’ आणि ‘एस५’ या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे असून ते कार्यरत होते. त्यामुळे आरोपीच्या हालचाली त्यात कैद झाल्या आहेत. रेल्वे पोलीस एक्स्प्रेसमधील आणि रेल्वे परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण आणि प्रवाशांनी मोबाइलमध्ये केलेले  चित्रीकरण तपासणार आहेत.

चौथ्या मृताची ओळख पटली

गोळीबारात मृत झालेला चौथा प्रवासी सय्यद सैफुद्दीन मैनुदीद (४३) आहे. तो मूळचा कर्नाटकमधील असून सध्या हैदराबाद येथे वास्तव्य करत होता. मैनुदीद हा मोबाइल दुरुस्ती करण्याचे काम करत होता. एक्स्प्रेसमधील बी-२ डब्यातून मैनुदीद प्रवास करत होता. त्याचा मृतदेह खानपान डब्यातून बोरिवली रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतला.

मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये मदत जाहीर

पश्चिम रेल्वेवरील जयपूर – मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये सोमवारी सकाळी गोळीबारात ठार झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना मंगळवारी पश्चिम रेल्वेकडून १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या प्रकरणात रेल्वेचे वरिष्ठ साहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) टिकाराम मीना (५७), अब्दुल कादीर (५५), असगर किया (५०) आणि सय्यद सय्युद्दीन मेमुद्दीन (४३) अशा चौघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी भारतीय दंडसंहिता आणि रेल्वे कायद्यातील संबंधित कलमांतर्गत निष्पाप नागरिकांची हत्या आणि सेवा शस्त्राचा गैरवापर केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे.

संपूर्ण प्रकरणाचा तपास वेगात आणि सर्व बाजूंनी करण्यात येत आहे. रेल्वे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी प्रत्येक बाबींचा शोध घेत असून लवकरच सर्व प्रकरण उघडकीस आणले जाणार आहे.  – डॉ. प्रज्ञा सरवदे, लोहमार्ग पोलीस महासंचालक

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway police in uttar pradesh in case of firing jaipur mumbai train firing ysh