पाण्यावर माणसांप्रमाणेच इतर सजीवांचाही समान हक्क आहे. प्राणी, वनस्पती त्यांच्या गरजेपुरताच पाण्याचा वापर करतात. माणूस मात्र पाण्याचा सर्वाधिक साठा करतो, नासाडी आणि प्रदूषणही करतो. हे रोखण्यासाठी पाण्यावर समग्र सृष्टीचा समान हक्क आहे हे मान्य करायलाच हवे. एवढेच नव्हे तर त्या हक्कानुसार आपली कृती बदलायला हवी असे ठाम प्रतिपादन महाराष्ट्र निसर्ग उद्यानाचे उपसंचालक अविनाश कुबल यांनी ‘पाणी नेमके कुठे मुरते’ या चर्चासत्रात केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाणी हे सर्वासाठीच गरजेचे आहे. त्यामुळे सजीवसृष्टीचा पाण्यावरील हक्क अबाधित ठेवून त्यांना त्याचा वापर योग्य प्रकारे करण्याची मुभा दिली तर सृष्टीचे चक्र कायम राहू शकते. मात्र, सध्या आपण पाण्याचा वारेमाप वापर करीत असून प्रदूषणही होत आहे. परिणामी सजीव सृष्टीची प्रगती खुंटली आहे. त्यासाठी जलसंधारणात सजीव सृष्टीचा अंतर्भाव करण्याची गरज असून त्यासाठी लोकसहभागातून पाण्याचे नियोजन केल्यास अनेक प्रश्न सुटू शकतात असेही शेवटी कुबल यांनी सांगितले.

नद्या जगवणे गरजेचे
जलकिनाऱ्यांवर सध्या नागरीकरण झपाटय़ाने वाढते आहे. त्याचा ताण जलस्रोतांवर येत आहे. त्या नादात नद्यांचे पाणी पळवण्याचा, वळवण्याचा प्रयत्न होतो. नागरीकरणाच्या नादात आपण हे सर्व करत आहोत. त्यामुळे विस्थापितांचे प्रमाण वाढते आहे. आर्थिक पॅकेज दिले म्हणजे विस्थापन होते, असे नव्हे. विस्थापितांचे भावनिक व सामाजिक विस्थापनही होत असते. प्रत्येक गोष्ट पैशात मोजता येत नाही. हे सर्व कुठेतरी थांबायला हवे. नद्यांचे पाणी वाचवायला हवे, असे मत या चर्चासत्रात बोलताना जल अभ्यासक सचिन वझलवार यांनी व्यक्त केले. आपली संस्कृती नद्यांच्या पाण्यावर पोसलेली आहे. त्यामुळे नद्यांच्या पाण्याला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे असताना आपणच नद्यांचे पाणी पळवण्याचा, वळवण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी जंगलांचा नाश करायला पुढे सरसावतो. त्याचा अंतिम परिणाम जंगलातील जीवसृष्टीवर तर होतोच शिवाय तेथील मूळ निवासींवरही होतो. त्यामुळे नद्या जगवल्या गेल्या पाहिजेत. त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. पाण्याची काळजी घेतली गेली पाहिजे, असे वझलवार म्हणाले.
लोकसहभाग महत्त्वाचा
मराठवाडय़ाकडे कायमच दुष्काळी प्रदेश म्हणून पाहिले जाते. मात्र, या दुष्काळी प्रदेशात लोकसहभागातून पाणी वाचवण्याचे, शेती फुलवण्याचे प्रयत्न यशस्वी होत आहेत, असे प्रतिपादन औरंगाबाद येथील सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ संस्थेचे जल कार्यकर्ता डॉ. प्रसन्न पाटील यांनी चर्चासत्रादरम्यान केले. दुष्काळी भागातही पाणी वाचवण्यासाठी मोठय़ा कार्याची गरज आहे. दुष्काळी भागातील लोकांचा मानसिकता समजून घेतली जाणे गरजेचे आहे. तिथे केवळ आत्महत्याच होतात असे नव्हे तर सकारात्मक गोष्टीही घडत असतात. त्यांचीही दखल घेतली जावी, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले. दुष्काळामुळे लोकांमध्ये जागरुकता येते. पाण्याचे महत्व कळते. आणि त्यातूनच मग जलसंधारणाच्या, पाणी वाचवण्याच्या प्रयत्नांना प्रतिसाद मिळू लागतो. लोकांचा सहभाग वाढतो. लोकसहभागातून झालेल्या कामांचे मोल अधिक असते. त्यामुळेच पाणी वाचवण्याच्या, उपलब्ध पाण्यात शेती फुलवण्याच्या आमच्या मोहिमेत लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे सांगत जनजागृतीबरोबरच लोकसहभागाची महती पाटील यांनी अधोरेखित केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rivers water must to save