मुंबई : शाळा- महाविद्यालयांत जाणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येत आहेत. फक्त १५ दिवसात म्हणजे १६ जून ते ३० जूनदरम्यान तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थी – विद्यार्थिनींनी या योजनेचा लाभ घेतला, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक म्हणाले की, नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा १६ जूनपासून सुरू झाल्या. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून पाससाठी ६६.६६ टक्के सवलत दिली आहे. म्हणजे केवळ ३३.३३ टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. याअंतर्गत १ लाख ६१ हजार २०४ विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन एसटी कर्मचाऱ्यांनी पास वितरित केले. त्याचप्रमाणे शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण करण्यात येते. याअंतर्गत ३ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थिनींना त्यांच्या शाळा-महाविद्यालयात जाऊन पास वितरित करण्यात आले.
यापूर्वी विद्यार्थ्यांना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापनकडून पास घ्यावे लागत होते. आता विद्यार्थ्यांना पाससाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा – महाविद्यालयांनी उपलब्ध केलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून संबंधित विद्यार्थ्यांना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येत आहेत. एसटी प्रशासन १६ जूनपासून ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही विशेष मोहीम राबवित आहे. तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले होते. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होत आहे, असे सरनाईक म्हणाले.
शालेय बस फेऱ्या रद्द करू नये
नवे शैक्षणिक वर्ष जूनपासून सुरू झाले. लाखो विद्यार्थी एसटीच्या बसने शाळेत जात असून एसटीने त्यांच्यासाठी हजारो शालेय बस फेऱ्या सुरू केल्या आहेत. परंतु विविध कारणांमुळे काही फेऱ्या अचानक रद्द केल्या जातात, अशा तक्रारी शालेय विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून करण्यात येत आहेत. विशेषतः आदिवासी पाडे आणि दुर्गम भागातील शालेय विद्यार्थी – विद्यार्थिनींना एकच बस फेरी उपलब्ध असून ती रद्द झाल्यास त्यांची प्रचंड गैरसोय होते. त्यामुळे यापुढे प्रत्येक आगारप्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शालेय फेरी कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना सरनाईक यांनी एसटी महामंडळाला केली.