भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अतिरेक्यांशी संबंध असल्याचे पुरावे असतील आणि हिंमत असेल, तर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कारवाई करावी, असे आव्हान देत त्यांच्यावर संसद अधिवेशनात व बाहेरही हल्लाबोल करण्याचा इशारा भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी दिला. बेलगाम व बिनबुडाचे आरोप सहन केले जाणार नाहीत. काँग्रेसच्याच चुकीच्या धोरणांमुळे अतिरेक्यांना प्रोत्साहन मिळाले, असा आरोप करीत अध्यक्ष सोनिया गांधी व पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी मौन बाळगल्याने नायडू यांनी संताप व्यक्त केला. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी मंत्रालयाजवळ  शिंदे यांच्याविरोधात जोरदार निदर्शने केली.
भिंद्रनवालेंसारख्यांना काँग्रेसने प्रोत्साहन दिले. गैरकाँग्रेसी सरकारे अस्थिर करण्यासाठी राज्यपाल प्रणालीचा गैरवापर काँग्रेसने केला, सीबीआय, आयबी, प्राप्तिकर विभाग आणि आता गृहमंत्रालयाचाही गैरवापर करून राजकीय पक्षांवर आकसाने कारवाया होत आहेत. भाजप – संघ यासारख्या राष्ट्रहित जपणाऱ्यांवर आरोप करून अतिरेक्यांना प्रोत्साहन व मदत करण्याचे काम काँग्रेस करीत आहे, असे नायडू यांनी स्पष्ट केले. नायडू, राज पुरोहित, अतुल शहा आदींसह काही भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी निदर्शनांनंतर ताब्यात घेऊन सोडून दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Take action against bjp if evidence found