भिवंडीच्या वलपाडा परिसरातील एक तीन मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ४० ते ५० रहिवासी अकडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना बाहेर काढण्याचं काम अद्यापही सुरू आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महापालिकेडून देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “उद्धव ठाकरेंनी जैतापूरचा प्रकल्प होऊ नये म्हणून…”, नारायण राणेंचा गंभीर आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीच्या कैलास नगर भागातील वलपाडा परिसरात ‘वर्धमान कंपाऊंड’ नावाची तीन मजली इमारत होती. या इमारतीच्या खाली एक गोदाम होते. तर वरच्या दोन मजल्यावर रहिवासी राहत होते. मात्र, आज दुपारी दीडच्या सुमारास अचानक ही इमारत कोसळली. त्यानंतर या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ४० ते ५० रहिवासी अकडले असल्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी झाले असून ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

तिघांचा मृत्यू, सात जखमी

या दुर्देवी घटनेत आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. नवनाथ सावंत ( ३५), सोना मुकेश कोरी (५) आणि ललिता रवी मोहतो (२९ ) अशी मृत्य झालेल्यांची नावे आहेत, तर मुख्तार रोशन मंसुरी (२६ ) चिकू रवी मोहतो (५) प्रिन्स रवी मोहतो ( ३ ) विकासकुमार मुकेश राजभर (१८ ) उदयभान मुनिराम यादव (२५ ) अनिता (३० ) उज्वला कांबळे (३० ) अशी जखमी झालेल्यांची नावं आहेत. जखमींना भिवंडीतील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इमारतीच्या मालकावर गुन्हा दाखल

दरम्यान, याप्रकरणी इमारतीचे मालक इंद्रपाल पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे. तसेच या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदारचाही शोध सुरू असल्याची माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three floor building collapses in bhiwandi walpada area spb