मुंबई : अर्भक व नवजात शिशु मृत्यू दर कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत असून, शासकीय रुग्णालयांतील विशेष नवजात काळजी कक्षांमध्ये (एसएनसीयू) सन २०२० ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत एकूण २,७७,११४ बालकांना दाखल करून मोफत यशस्वी उपचार करण्यात आले. याच कालावधीत नवजात शिशु मृत्यू दर कमी करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील अर्भक व नवजात शिशु मृत्यू दर कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रयत्नांना यश येत असल्याचे गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने नवजात बालकांचे आजार व मृत्यू टाळण्यासाठी व बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. या सर्व योजनांची अंमलबजावणी राज्य व जिल्हा स्तरावरून करण्यात येते.

हेही वाचा – सर्वच जुन्या इमारतींचे पावसाळ्यापूर्वी संरचनात्मक सर्वेक्षण

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, सन २०२०-२१ व सन २०२१-२२ या कालावधीत एसएनसीयूमध्ये ९७,३९२ बालकांना दाखल करुन उपचार करण्यात आले. तसेच २०२२-२३ ते २०२४-२५ (नोव्हेंबर २०२४ अखेर) या कालवधीत एसएनसीयूमध्ये १,७९,७२२ बालकांना दाखल करुन उपचार करण्यात आले. मागील दोन वर्षामध्ये एसएनसीयूमध्ये दाखल करुन उपचार केलेल्या बालकांमध्ये वाढ होत आहे.नोव्हेंबर २०२४ अखेर या कालावधीचा नवजात शिशु मृत्यू दर हा सन २०२०-२१ वर्षातील ७.५० टक्के वरुन ५.०४ टक्क्यांवर आलेला आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये एसएनसीयू मधील मृत्यू दर २.४६ टक्क्यांनी कमी झाला आहे. एसएनसीयूमध्ये दरवर्षी अंदाजे ५०,००० गंभीर आजारी बालकांवर उपचार केले जातात. सन २०२२-२३, २०२३-२४ व २०२४-२५ (नोव्हेंबर २०२४ अखेर) या कालावधीत अत्यंत कमी वजनाच्या (१,५०० ग्रॅमपेक्षा कमी) एकूण ६,७९८ नवजात बालकांवर यशस्वीरित्या उपचार करुन नवजीवन मिळाले आहे.

जिल्हा, महिला, उपजिल्हा रूग्णालयांत आजारी नवजात आणि कमी वजनाच्या नवजात बालकांचे व्यवस्थापन आणि उपचार करण्यासाठी विशेष नवजात काळजी कक्ष (एसएनसीयू)ची स्थापना करण्यात आलेली आहे. राज्यात १८ जिल्हा रुग्णालये, १२ महिला रुग्णालये, १५ उपजिल्हा रुग्णालये, ३ सामान्य रुग्णालये, १ ग्रामीण रुग्णालय, १ शासकीय वैद्यकिय महाविद्यालय आणि ५ कॉर्पोरेशन हॉस्पिटलमध्ये मिळून एकूण ५५ एसएनसीयू कार्यरत आहेत. प्रत्येक कक्षामध्ये १ बालरोग तज्ज्ञ, २ वैद्यकीय अधिकारी, १० ते १२ परिचारिका आणि ४ सहाय्यक कर्मचाऱ्यांसह किमान १२ ते १६ खाटा असून, नवजात किंवा विशेष काळजी आवश्यक असणाऱ्या बालकांसाठी चोवीस तास सेवा प्रदान केली जाते. हे युनिट रेडियंट वॉर्मर, फोटोथेरपी युनिट, इन्फ्युजन पंप, सीपॅप मशिन, मॉनिटर्स यांसारख्या वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज आहेत. आजारी नवजात अर्भकांना हायपोथर्मिया, सेप्सिस/इन्फेक्शन, कावीळ, श्वास गुदमरलेली बालके, शरीराचे तापमान कमी झालेली बालके, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झालेली बालके, प्रतिजैविक, असिस्टेड फीडिंग, विशेष स्तनपान, जन्मानंतरची काळजी व संदर्भ सेवा यांसारख्या सेवा पुरविल्या जातात.

हेही वाचा – सर्वच जुन्या इमारतींचे पावसाळ्यापूर्वी संरचनात्मक सर्वेक्षण

एसएनसीयूमध्ये दाखल कमी वजनाच्या आजारी गंभीर नवजात बालकांना श्वासोच्छवासाच्या आधाराची आवश्यकता असते. त्यांच्याकरिता नॉन-इनवेसिव्ह व्हेंटिलेशन (उदा. सीपीएपी) तसेच अकाली जन्मलेल्या नवजात अर्भकासाठी तांत्रिक समिती मार्फत सर्फॅक्टंट वापराबाबत सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार सेवा पुरवल्या जातात. कमी वजनाच्या बाळांसाठी कांगारू मदर सेवा, जन्मजात आंधळेपणा (रेटिनोपॅथीऑफ प्रीमॅच्युरिटी), जन्मजात बहिरेपणा (ओएई/बीईआरए चाचणी) यांसारख्या विशेष तपासण्या केल्या जातात. या ठिकाणी सर्व तपासण्या व उपचार मोफत केले जातात,असे आरोग्य संचालक डॉ नितिन अंबाडेकर यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Treatment of 2 lakh 77 thousand babies in special neonatal care units of the health department mumbai print news ssb