Water Tanker Service in Mumbai : धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने आधीच मुंबईतील पाणीपुरवठा कमी झाला असून आता त्यात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. १० एप्रिलपासून मुंबईथील वॉटर टँकर सेवा बंद होणार आहे. मुंबई पालिकेने केंद्रीय भूजल प्राधिकरणाबाबत नवे नियम लागू केल्याने मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईतील विहीर आणि बोअर मालकांनी केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमानुसार एनओसी घ्यावी, अन्यथा पाणीपुरवठा बंद होईल, अशी नोटीस मुंबई पालिकेकडून आल्याने अनेक विहीर आणि बोअरवेल मालकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बोअरवेल मालकांकडे एनओसी नसल्याचे आढळून आल्याने पाणीपुरवठा कसा करायचा? या चिंतेमुळे मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने या निर्णयाविरोधात वॉटर टँकर सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील विविध भागात आधीच पाणी पुरवठा सुरळीत नसताना वॉटर टँकर बंद झाल्यास मुंबईकरांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचं म्हणणं काय?

याबाबत मुंबई टँकर असोसिएशनचे अंकूर वर्मा म्हणाले, “मुंबई वॉटर टँकर असोसिएशन १० एप्रिलपासून व्यवसाय बंद करणार आहे. कारण आम्हाला सेंट्रल लॉन वॉटर अथॉरिटीबाबत मुंबई महापालिकेकडून नोटीस आली आहे. ३८१ ए ची नोटीस आली आहे. तुम्ही तुमची बोअरवेल काढून पाईप डिसमेंट करावी, अशी ही नोटीस आहे. ७० ते ८० वर्षांपूर्वीचा हा व्यवसाय आहे. जर टँकरच नसतील पाण्याची वाहतूक कशी होणार?” ते एपीबी माझाशी बोलत होते.

दरम्यान मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत ३३ टक्के पाणीसाठा उरला आहे. तर काही सोसायट्यांना टँकरमार्फत पाणी पुरवठा केला जात आहे. कुलाबा, घाटकोपर, मुलुंड, वरळी, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, कुर्ला, विद्याविहार, येथे तीव्र पाणीटंचाई असून या भागात मोठ्या प्रमाणात वॉटर टँकर्स मागवले जातात. तसंच, अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली बोअरवेलचे पाणी पुरवण्यात येत असल्याने नागरिकांचं आरोग्यही धोक्यात आलं आहे.

मुंबईत पाणीबाणीचं संकट?

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी सातही धरणांतील पाणीसाठा ३३.५७ टक्क्यांवर आला आहे. वातावरणातील उष्मा वाढू लागला असून हा पाणीसाठा जुलैअखेरीपर्यंत पुरवावा लागणार आहे. मुंबईकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागू नये म्हणून मुंबई महापालिकेने आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती केली आहे. ऊर्ध्व वैतरणा धरणातून ६८ हजार दशलक्ष लिटर, तर भातसा धरणातून १ लाख १३ हजार दशलक्ष लिटर राखीव साठ्याच्या पाण्याची मागणी नोंदवली आहे. पाऊस लांबल्यास मुंबई महापालिकेला या राखीव साठ्याचा वापर करावा लागणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water tanker service in mumbai will be closed from 10th april due to bmc new rule sgk