अकोला : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले. या भागातील आदिवासींना राज्य शासनाकडून नुकसान भरपाईपोटी मोठी रक्कम देखील देण्यात आली. ही नुकसान भरपाईची रक्कमच कौटुंबिक वादाचे कारण म्हणून समोर आली आहे. अकोट तालुक्यातील मोहपाणी गावात वडिलांना मिळालेल्या व्याघ्र प्रकल्पाच्या नुकसान भरपाईतील पैशांवरून पिता-पुत्रांमध्ये मोठा वाद झाला. या वादाने टोक गाठले. अखेर मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांवर कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी गावात घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली.
अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील काही भाग हा मेळघाट व्याघ्र प्रकल्पात जातो. या व्याघ्र प्रकल्पातील वाघासह इतर जनावरांना मानवी हस्तक्षेपाचा त्रास होऊ नये, म्हणून प्रकल्पातील अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या पुनर्वसनामध्ये जमिनी गेलेल्या आदिवासींना शासनाकडून नुकसान भरपाई देखील देण्यात आली. नुकसान भरपाईपोटी लाखो रुपयांची रक्कम मिळाली. या रकमेवरून आता कौटुंबिक वाद होत आहेत. सध्या नाते, रक्तसंबंधापेक्षा पैसा हा महत्त्वाचा ठरतो. पैशांवरून होणारे वाद टोकाला जात असताना आपल्या जन्माच्या नात्याचा देखील विचार केला जात नाही.
अकोट तालुक्यातील मोहपाणी या गावात पैशाच्या वादातून एका पुत्राने आपल्या पित्याचीच कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत नरसिंग तेरसिंग जमरा यांना व्याघ्र प्रकल्पांतर्गत १३ लाख रुपयांची भरपाई मिळाली होती. पैशांच्या वाटपावरून वडील व मुलगा यांच्यात सतत वाद होत होते. याच कारणावरून गुरुवारी पुन्हा पिता-पुत्रामध्ये मोठा वाद झाला. या वादातून हाणामारी झाली. यात रामसिंग नरसिंग जमरा याने वडिलांवर कुऱ्हाडीने जबर वार करून त्यांची निर्घृण हत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरोपी रामसिंग याला ताब्यात घेतले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी मृताचे नातेवाईक मोहन नवलसिंग जमरा यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अकोट उपविभागीय अधिकारी मित्तल पोलिस अनमोल यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरखेड पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन राठोड, प्रमोद भोंगळ, अनंता मुळे, जवरिलाल जाधव, आकाश गजभारे आदींच्या पथकाने केली.