भंडारा : मातृत्व हा स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि नाजूक काळ असतो. या काळात आई आणि बाळाचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही सर्वोच्च गरज असते. गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत आणि त्यानंतरच्या काळात योग्य काळजी न घेणे या दोघांसाठीही जोखमीचे कारण ठरू शकते. या पार्श्वभूमीवर शासन पंतप्रधान सुरक्षित मातृत्व सारख्या योजना राबवण्यात येतात मात्र ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक सुविधांचा अभाव आणि अनेकदा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ आणि बाळंतीणीला जीव गमवावा लागत असल्याच्या अनेक घटना आजही ग्रामीण भागात घडत असतात. अशीच एक घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात घडली आहे. प्रसूती पश्चात एका बाळाचा आणि मातेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

प्राप्त माहितीनुसार, लाखांदूर तालुक्यातील आसोला या गावातील रीना शहारे यांना सोमवारी रात्री लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी १९ ऑगस्ट रोजी सकाळी तिला प्रसूती कळा सुरू झाल्या. सकाळी महिलेची प्रसूती झाली मात्र तिचे बाळ गर्भातच दगावल्याचे सांगण्यात आले. दरम्यान बाळंतीण महिलेला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने तिची प्रकृती चिंताजनक झाली. तिला भंडारा जिल्हा रुग्णालयात नेण्याचा निर्णय झाला. मात्र, वाटेतच तिचाही मृत्यू झाला. लाखांदूर हे भंडारा जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील तालुका आहे. तिथं आरोग्य सुविधेचा अभाव असल्यानं ही घटना घडल्याचा रोष आता नागरिकांकडून करण्यात येत आहे.

रीना शहारे यांना एक मुलगा आहे. दुसऱ्यांदा देखील रीना यांनी त्यांचे बाळ प्रसूतीनंतर गमावले होते. आता तिसऱ्यांदा त्या गर्भवती होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाचे मातृछत्र हरवले आहे तर कुटुंबावर देखील मोठा आघात झाला आहे. रीना यांचे पती विनायक हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्यामुळे त्यांची परिस्थिती बिकट त्याची आहे अशातच पत्नी आणि नवजात बाळाचा मृत्यू हा विनायक यांच्यासाठी मोठा धक्का आहे.

मागील सहा महिन्यात तीन बाळंतिण आणि गर्भवती महिलांनी जीव गमावल्याच्या घटना लाखांदूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात घडल्या आहेत. सरांडी बुज, चिचगाव, त्यानंतर आता आसोला गावातील या बाळंतीण आणि बाळाचे जीव गमावला आहे . सध्या तालुक्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

डॉक्टर काय म्हणतात?

रीना शहारे यांना सकाळी प्रसूती वेदना सुरू झाल्या त्यावेळी माझ्यासह स्त्रीरोगतज्ञ आणि बालरोग तज्ञ तेथे हजर होते. बाळाच्या मेंदूला ऑक्सिजन आणि रक्तपुरवठा न झाल्यामुळे बाळाचा गर्भातच मृत्यू झाला. दरम्यान, रीना यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने आणि रुग्णालयात अत्यावश्यक सुविधा नसल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात रेफर करण्याशिवाय पर्याय नव्हता मात्र वाटेतच अतिरक्तस्त्रावामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे एनआयसी, लहान मुलांचे अतिदक्षतागृह किंवा बधिरीकरण तज्ञ किंवा कोणत्याही अत्यावश्यक सुविधा नाहीत, असे लाखांदूरच्या ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. दत्तात्रय ठाकरे यांनी सांगितले.

योजना कागदावरच

जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, मिशन इंद्रधनुष, आयरन आणि फोलिक ऍसिड पूरक आहार अशा अनेक योजना असताना आजही ग्रामीण भागातील जननी आणि बाळ असुरक्षित आहे. त्यामुळे या सर्व योजना केवळ कागदावरच आहे हे सिद्ध झाले आहे. आरोग्य हे प्राथमिकता असताना याला दुय्यम स्थानी ठेवल्यामुळे आज ही परिस्थिती उद्भवली आहे, असे जयश्री बोरकर, म्हणाल्या.