नागपूर : जम्मू- काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ‘ऑपरेशनन सिंदूर’मधून घेतला आहे. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करुन पाकिस्तानच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर देत पहलगाममध्ये मृत्यूमुखी पडलेल्या २६ पर्यटकांनाही न्याय दिला आहे.२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात उघड झाला आहे आणि त्याचा उद्देश देशात जातीय तणाव वाढवणे होता.पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यात भारतीयांनी आपल्या प्रियजनांना गमावले होते. आज त्या दहशतवादी कारवायांना भारतीय सशस्त्र दलाने चोख उत्तर दिले आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ अड्ड्यावर क्षेपणास्त्र हल्ला भारतीय हवाई सेनेन केली. यात अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. निष्पाप भारतीयांना न्याय देण्यासाठी सैन्याने केलेल्या या कारवाईचे आम्ही अभिनंदन करतो असे काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधून भारतावर होणाऱ्या दहशतवादी कारवाया विरोधात भारताने नेहमीच कठोर भूमिका घेतली आहे. भारताविरुद्ध कोणताही दहशतवाद भारत सहन करणार नाही हाच संदेश आज या कारवाई मधून देण्यात आला आहे. भारतीय सैन्याने दाखवलेल्या धैर्याचा आणि दृढनिश्चयाचा आम्हाला अभिमान आहे असे विधिमंडळ नेते वडेट्टीवार म्हणाले.

याआधी देखील देशावर जेव्हा संकट आले तेव्हा भारतीय सैन्याने कारवाई केली आहे. आणि आज देखील दहशतवाद्या विरोधात केलेल्या कारवाईने दाखवून दिले की भारत आपल्या नागरिकांवर होणारे हल्ले सहन करणार नाही. पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज होती आणि आज भारतीय सैन्याने एक मोठा धडा पाकिस्तानला शिकवला आहे असे वडेट्टीवार म्हणाले. दहशतवाद विरोधात भारतीय सैन्य आणि केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रत्येक कारवाईला आमचा पाठिंबाच आहे ,अस वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात उघड झाला आहे, त्याची रूपरेषा पाकिस्तानच्या ट्रॅक रेकॉर्डशी जुळते. पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनले आहे, दहशतवादी येथे लपण्यासाठी येतात. हल्ल्याला १५ दिवस उलटूनही पाकिस्तानने कोणतीही कारवाई केलेली नाही. आज भारताने सीमापार दहशतवादी हल्ले रोखण्याचा आणि त्यांना प्रत्युत्तर देण्याचा आपला अधिकार वापरला आहे. दहशतवादाविरुद्ध मोजमापाने कारवाई केली असून आमची कृती चिथावणीखोर नाही. आम्हाला गुप्तचर माहिती होती की आणखी हल्ले होऊ शकतात, असे लष्कराने म्हटले आहे.