बुलढाणा: मेहकर परिसरात २५ जूनच्या संध्याकाळपासून सुरु झालेल्या संततधार पावसाचा फटका समृद्धी महामार्गलादेखील प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे बसला आहे. मेहकरजवळून जाणाऱ्या समृद्धीच्या पुलाखाली पाणी साचल्याने व नदीसारखा प्रवाह वाहत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गालासुद्धा पावसाचा फटका बसला. मेहेकर येथील इंटरचेंज टोल नाक्यावर जाण्यासाठी रस्ता पाण्याखाली गेला असून त्याला अक्षरशः नदीचे रूप आले आहे. समृद्धीवर जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना मेहकरमध्ये चढण्यासाठी वा उतरण्यासाठी मेहकर इंटरचेंजचा वापर करण्यात येतो. मात्र त्याच रस्त्यावर मुसळधार पावसाने नदीसदृश्य पाण्याचा प्रवाह वाहायला लागला असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या तीन तासांपासून हा मार्ग पाण्याखाली गेला आहे. मेहेकर तालुक्यात पावसाचे थैमान दिसून आले आहे.
दोघांचा बळी
दरम्यान लोणार तालुक्यातील बीबी परिसरात एका युवकाचा पुरात वाहून गेल्याने भीषण मृत्यू झाला. रोहिदास श्रवण शिरसाट ( वय २६ वर्षे, राहणार दादूल गव्हाण) असे मृत युवकाचे नाव आहे. महार चिकना गावाच्या फाटावरील एका बिअर बारमध्ये तो कामाला होता. तो नैसर्गिक विधीसाठी गेला असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पुरात वाहून गेला. काल रात्री उशिरा त्याचा मृतदेह परिसरातील नाल्याच्या पुलाखाली आढळून आला. मेहकर तालुक्यातील शेंदला येथे एका महिलेचा करुण अंत झाला. आशा प्रभाकर लोंढे ( वय ५५ वर्षे, राहणार शेंदला, तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा) असे दुर्देवी महिलेचे नाव आहे. त्यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून त्याखाली दबल्याने त्या दगावल्या.
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर आणि लोणार तालुक्यात या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. शेतकऱ्यांनी नुकत्याच केलेल्या पेरण्या मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. मेहकर तालुक्यातील जानेफळ परिसरात विशेषतः पावसाचा मोठा तडाखा बसला. गावालगतच्या नाल्याला पूर आला असून वरून आलेल्या पाण्यामुळे शेगाव–पंढरपूर पालखी मार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. यात्रेकरूंना व नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना सुरक्षिततेसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बुलढाणा : मेहकर परिसरात २५ जूनच्या संध्याकाळपासून संततधार पाऊस. मेहकरजवळून जाणाऱ्या समृद्धीच्या पुलाखाली पाणी साचल्याने व नदीसारखा प्रवाह वाहत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली.https://t.co/2jrmCKw8Ui#Nagpur #Heavyrain pic.twitter.com/tTN9xCATpL
— LoksattaLive (@LoksattaLive) June 27, 2025
मेहकर उपविभागातील बोरखेडी तलावाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. तलाव ७५ टक्क्यांहून अधिक भरल्याने लवकरच सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पशुधन, शेतीची अवजारे आणि इतर आवश्यक साहित्य सुरक्षितस्थळी हलविण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणा सज्ज असून नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे.