चंद्रपूर : सूरजागडहून लोहखनिज वाहून नेणाऱ्या हायवा ट्रकने समोरून आलेल्या दोन दुचाकींना जबर धडक दिली. यात दुचाकीवरस्वार तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास आक्सापूर येथील मंदिराजवळ घडली. शैलेंद्र कालिप्तराय (६३, रा. विजनगर, मुलचेरा जि. गडचिरोली), अमृतोष सुनील सरकार (३४, रा. कालीनगर), मनोज निर्मल सरदार (४३, रा. विजयनगर) अशी मृतांची नावे आहेत. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला.

अहेरी-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावर दिवस रात्र लोहखनिजाच्या कच्च्या मालाची वाहतूक सुरू असते. याआधीही या मार्गावर अनेक अपघात घडले असून त्यांत अनेकांनी आपला जीव गमवला. काहींना कायमचे अपंगत्व आले. अशातच आज झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याने सूरजागड लोहखाणीतील वाहतूक आणखी किती बळी घेणार, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

हेही वाचा – पडळकर म्हणाले, “ओबीसीच नव्हे तर एससी एसटीच्या आरक्षणावर घाला”

हेही वाचा – रणजी सामन्यात सौराष्ट्रकडून महाराष्ट्राचा दारूण पराभव, पार्थ भूटचे सात बळी; धर्मेंद्र जडेजा सामनावीर

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली. कोठारी व गोंडपिपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बल्लारपूर येथील रुग्णालयात पाठवले. पुढील तपास कोठारी व गोंडपिंपरी पोलीस करीत आहे.