नागपूर : यशोधरा नगर आणि पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्येच्या घटना घडल्या. वैयक्तिक वादातून हे खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनांमुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे चित्र निर्माण झाले असून, उपराजधानी ‘क्राईम कॅपिटल’ होत असल्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही महिन्यांपासून नागपूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यात नागपूर पोलिसांना यश आले होते. मात्र, एकाच रात्री खुनाच्या दोन घटना घडल्यामुळे पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. पाचपावली परिसरातील राणी दुर्गावतीनगर चौकात रात्री साडेअकराच्या सुमारास खुनाची पहिली घटना घडली. येथे जुन्या भांडणातून २५ वर्षीय उमेश नंदेश्वर याचा खून झाला. याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे.

हेही वाचा – भंडारा : सख्खे भाऊ आंघोळीसाठी तलावात गेले, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले

हेही वाचा – ‘दुष्काळात तेरावा..! महाविद्यालयीन शिक्षणही आता ‘जीएसटी’च्या कक्षेत, गोंडवाना विद्यापीठाने काढले परिपत्रक

दुसरी घटना यशोधा नगर येथील विनोबा भावेनगर परिसरात घडली. या घटनेत धिरज चुटेलकर या तरुणाचा खून झाला असून, त्याचा मित्र राजेश मन्ने गंभीर जखमी झाला आहे. दोघांवरही चाकूने वार करून जखमी केले होते. दरम्यान, त्यांच्या नातेवाईकांनी मेयो रुग्णालयात चांगलाच गोंधळ घातला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. यापूर्वी दरवर्षी नागपूर शहरात खुनाच्या सरासरी शंभर घटना घडत होत्या. गेल्या वर्षी हा आकडा बराच कमी झाला. नागपूर शहरात दर महिन्यात सरासरी हत्येच्या ५ ते ६ घटनांची नोंद गेल्यावर्षी झाली. शहरात हत्येच्या एकूण ७६ घटना घडल्या होत्या. चालू वर्षात केवळ १०० दिवसांतच हत्येच्या १९ घटना घडल्या आहेत. यावरून उपराजधानीचा ‘क्राईम कॅपिटल’च्या दिशेने प्रवास सुरू आहे का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two murders in one night in nagpur and 19 murders in 100 days adk 83 ssb