नाशिक – पाडापाडीच्या राजकारणाने कोणाचाही फायदा होणार नाही. निवडून आलेला उमेदवार समाजाच्या प्रश्नांवर बोलू शकणार नाही. तो त्याच्या पक्षाचा कार्यक्रम राबवेल. त्यामुळे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी परिवर्तन महाशक्तीबरोबर यावे, असे आवाहन महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे भोसले यांनी केले आहे. आमच्याबरोबर येण्यास अडचण असेल तर, त्यांनी आपले उमेदवार उभे करावेत, असा सल्लाही जरांगे यांना दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक येथे भोसले यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. प्रहार, स्वराज्य पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आदींनी एकत्रित येत विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून तिसरी आघाडी स्थापन केली आहे. राजश्री शाहू महाराजांनी बहुजन समाजाला ५० टक्के आरक्षण दिले होते. यात अनुसूचित जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचाही समावेश होता. कुणाला न दुखावता मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकते. सत्ताधाऱ्यांनी दोनवेळा दिलेले आरक्षण टिकले नाही. कुणबी आणि मराठा एकच आहेत. सामाजिक मागासलेपण सिद्ध केले, याचाच अर्थ ओबीसी आहे. लोकसंख्येच्या आधारावर कुणाला किती आरक्षण मिळते, याचे सर्वेक्षण व्हायला हवे. ओबीसीतील लहान जातींनाही आरक्षणाचा लाभ मिळत नाही. मनोज जरांगे आणि आपला उद्देश वेगळा नाही. त्यामुळे आपण एकत्र लढू, असे त्यांना सांगण्यात आल्याचे भोसले यांनी सांगितले.

हेही वाचा – नाशिकमध्ये काँग्रेस पाच जागांवर ठाम, नाशिक मध्यसाठी काँग्रेसकडून अजित पवार गटाचे रंजन ठाकरे इच्छुक

हेही वाचा – नाशिक जिल्ह्यात ‘एलडीओ’ नावाखाली डिझेलची अवैध विक्री; पेट्रोलपंप चालकांचा बंदचा इशारा

मागील ७५ वर्षांत सत्ताधारी आणि विरोधक तेच आहेत. त्यांच्याकडून मोठ्या वल्गना केल्या जातात. मात्र सामान्यांचे आरोग्य, शिक्षणाशी संबंधित मूलभूत प्रश्नही सोडविले गेले नाहीत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. पण राज्यात मराठी शाळा नाहीत. महायुती व महाविकास आघाडीला आव्हान देण्यासाठी परिवर्तन महाशक्ती पूर्ण ताकदीने सर्व २८८ जागा लढविणार आहे. जागा वाटपाबाबत पुण्यात सर्व घटक पक्षांची बैठक होणार असून चार-पाच दिवसांत जाहीरनामाही प्रसिद्ध केला जाणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange should come to parivartan mahashakti says of sambhajiraje bhosale ssb